ताज्या घडामोडी

सेल्फीचा नाद भोवला – वरोऱ्यातील चार युवक घोडाझरीत बुडाले

पोलीस पथक घेताहेत युवकांचा शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

सुधाकर श्रीरामे नागभिड

पावसाळा सुरू होताच निसर्ग पर्यटनाला उधाण येते. ठिकठिकाणी फुलणारे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्याचा मोह सर्वांनाच होत असतो. ह्यासाठी पर्यटक शक्यतो पाणवठे, नदी, तलाव, अरण्य तसेच धबधब्याच्या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य टिपण्यासाठी जात असतात. ह्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांना फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. आजकाल सर्वांच्याच हाताशी असलेल्या मोबाईल मधुन सेल्फी घेण्याची जणु ह्या ठिकाणी स्पर्धाच सुरू होते मात्र सेल्फी घेताना बऱ्याचदा आजूबाजूला असलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने अपघात घडून आतापर्यंत विविध ठिकाणी शेकडो पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशीच दुर्दैवी घटना दिनांक 16 जुलै रोजी नागभिड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या परिसरात घडली आहे. प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मनीष श्रीराम (26), धीरज झाडें (27), संकेत मोडक (25), चेतन मांदाडे (17) हे चार युवक रविवारच्या सुटीचा आनंद घेण्याच्या उद्देशाने आपल्या इतर चार मित्रांसह निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध मुक्ताई धबधबा परिसरात गेले. मात्र त्या परिसरात दोन दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यु झाल्याने वनविभागाने त्या परिसरात येण्यास बंदी घातल्याने हे युवक नगाभिड तालुक्यातील घोडाझरी तलाव बघण्यासाठी गेले.

परिसरातील सौंदर्य भरभरून बघत असताना त्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही व अर्थातच त्यांनी सेल्फी घेणे सुरू केले. दरम्यान त्यातील एका युवकाचा सेल्फी घेताना पाय घसरल्याने तो तलावात बुडू लागला. हे बघताच त्याला वाचविण्यासाठी सोबत आलेल्या इतर मित्रांपैकी तीन मित्रांनी पाण्यात उडी घेतली मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज नसल्याने ते तिन युवकही पाण्यात बुडाले.

सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला मात्र मदतीला कोणीही न आल्याने अखेरीस त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस पथक घटनस्थळी पोहचले असुन मनीष श्रीराम (26), धीरज झाडें (27), संकेत मोडक (25), चेतन मांदाडे (17) ह्या चारही युवकांचा शोध सुरू केला असुन बातमी लिहीतपर्यंत त्या युवकांचा शोध लागलेला नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये