ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी नातं जपणारी पवित्र परंपरा – आ. जोरगेवार

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजाशी जोडलेली आहे. समाजातील प्रत्येक घटक आनंदी, समृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देते. या परंपरेत आपल्या संस्कृतीचे मूळ दडले आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा शहराध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर अनिल फुलझेले, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, महामंत्री रवी गुरुनुळे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, प्रदीप किरमे, रवी जोगी, सुभाष अदमाने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेडकी, माजी नगरसेविका वनिता डुकरे, पुष्पा उराडे, शीतल गुरुनुले, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेचे उमेश साळुंखे, जनार्धन भुजाडे, राजू सांळुखे, राजकुमार भगाडे, सागर वाजेकर, श्रावण गदई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, गोवर्धन पूजा म्हणजे श्रद्धा, एकोपा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपला समाज एकत्र राहिला तर कोणतीही अडचण मोठी ठरत नाही. आज आपल्या देशात आणि राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर सामाजिक एकोपा, धार्मिक सौहार्द आणि सांस्कृतिक जपणूकही तितकीच आवश्यक आहे. अशा पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो.

आज या पूजेत इतक्या मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला व युवा सहभागी झाले, हे पाहून आनंद होत आहे. या आयोजनाने समाजात ऐक्य, भक्ती आणि सेवा भाव निर्माण केला आहे. आपण सर्वांनी दीपावलीच्या या शुभ पर्वावर मनातील अंधार दूर करून ज्ञान, प्रेम आणि एकतेचा प्रकाश पसरवून समाजातील प्रत्येक माणूस आनंदी राहावा, यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पूजन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये