अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदार व संबंधित यंत्रणेला निर्देश

चांदा ब्लास्ट
प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान खाते, नागपूर यांनी (दि.१९) चंद्रपूर जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” तसेच उद्या (दि.२०) “येलो अलर्ट” दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, घर व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा यांनी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.