भद्रावतीत शाळा परिसरातून मुले उचलणारी टोळी सक्रीय
हि अफवा असून अशी कोणतीही घटना न घडल्याचे स्पष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील केंद्रीय विद्यालय तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक शाळा परिसरात मुले उचलणारी टोळी आल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. यामुळे शहरातील प्रत्येक पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शाळांनी देखील प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर मॅसेज पाठवून काळजी घेण्याचे मॅसेज पाठविले.
परंतू ही घटना अफवा असून अशी घटना घडलीच नाही असे केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा चे मुख्याध्यापक आणि ठाणेदार भद्रावती यांनी माहीती दिली.
काय होता मॅसेज :
“सूचना – गेल्या ०२ दिवसांपासून काही अज्ञात पुरूष महिलांसह शाळा सुटल्यानंतर केव्ही शाळेत येत आहेत आणि मुलांना चॉकलेट देऊन आमिष दाखवत आहेत आणि सांगत आहेत की तुमचे पालक तुम्हाला घ्यायला येत नाहीत आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला सोडायला पाठवले आहे. ही घटना माझ्या एका आयईएसच्या मुलीसोबत घडली. पण त्याची मुलगी हुशार होती आणि तिने नकार दिला. ही बाब व्यवस्थापनाला सांगण्यात आली आहे. जे मुले केव्ही आणि ओएफ शाळांमध्ये शिकत आहेत त्यांनी कृपया त्यांच्या मुलांना सतर्क करावे.
केंद्रीय विद्यालयाच्या परिसरात अशी कोणतीही घटना घडली नसून ही अफवा आहे. आमच्या शाळेत सुरक्षा रक्षक नेहमी तैनात असून शाळेच्या आतमध्ये येण्यास विचारपूस करूनच परवानगी देतात. हा मॅसेज कोणी पाठवला माहीत नसून यासंदर्भात भद्रावती पोलिस ठाण्याला माहीती देण्यात आली आहे.
स्वाती विश्वकर्मा, मुख्याध्यापिका, केंद्रीय विद्यालय.
ही घटना आमच्या शाळेची नसून याबाबत आम्हालाही मॅसेजमुळेच माहीत झाले आहे. तरी आम्ही सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे शिवाय या घटनेनंतर ऑर्डनन्स फॅक्टरी कडून शाळेला सुरक्षा रक्षक देण्यात आले आहे.
गणेश कुमार, मुख्याध्यापक, ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा
आम्हाला कल्पना मिळाल्यानंतर केंद्रीय विद्यालयात बैठक घेण्यात आली असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे शाळेकडून स्पष्ट केले आहे. तसेच अशी घटना घडणार नाही याकडे शाळा व्यवस्थापन आणि पोलीस विभाग लक्ष देतील.
योगेश पारधी, ठाणेदार, पोलीस ठाणे, भद्रावती.