जिवती तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना नवसंजीवनी, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून मार्ग मोकळा
आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नाला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी संतोष इंद्राळे
जिवती :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम आणि आकांक्षित जिवती तालुक्यातील प्रलंबित वनजमीन पट्ट्यांच्या प्रश्नांना नवसंजीवनी मिळाली आहे. १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली.
आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा मुद्देसूद पाठपुरावा करत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.आमदार भोंगळे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या निर्देशांमुळे जिवती तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांचा निकाली निघणार आहे.यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिवती तालुक्यातील समस्या तीन महिन्यांत जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. विशेषत: वनक्षेत्र घोषित केलेल्या ८,६५९.८ हेक्टर जमिनीच्या सुधारणेसाठी तातडीने कार्यवाही करून आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले. यामध्ये १९८० पूर्वीच्या ६,२६० हेक्टर आणि १९८० ते १९९६ दरम्यानच्या २,६५० हेक्टर जमिनीचे प्रस्ताव दोन टप्प्यांत तयार करून केंद्र शासनाकडे पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वनसंवर्धन कायद्यांतर्गत केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या जमिनीचे निर्वणीकरण तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले.आमदार भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील अनेक समस्यांचा पाढा वाचला. १९५०-५५ च्या काळात मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवतीत स्थायिक झालेल्या नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांविना जीवन जगावे लागले. त्यांच्या तीन पिढ्या निघून गेल्या, तरी जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न कायम आहे. याशिवाय, जिवती, कोदेपूर आणि गुडसेला येथील सिंचनासाठी सुरू असलेली तलावांची कामे बंद पडली आहेत. जिवती नगरपंचायतीतील घरकुलांचा प्रश्न आणि वादग्रस्त १४ गावांचा मुद्दाही प्रलंबित आहे.
या सर्व समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि संपूर्ण समस्यांवर तीन महिन्यांत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री मंत्री अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव शोमिता विश्वास, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, अपर प्रधान वनसंरक्षक नरेश झीरमुरे यांच्यासह जिल्हा महामंत्री विवेक बोंढे,भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष महेश देवकते, तालुका अध्यक्ष दत्ता राठोड, भाजप नेते गोविंद टोकरे, तुकाराम वारलवाड, अश्पाक शेख, रामदास रणवीर, लिंबादास पतंगे, वैजनाथ सुलगे, ईश्वर आडे,अमोल थेरे, अमोल कांबळे, पत्रकार शंकर चव्हाण आणि शब्बीर जागीरदार उपस्थित होते.