ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुभाष नगर WCL कॉलनीत मोठा अपघात टळला

जीर्ण वसाहतींवरून कामगारांचा संताप

चांदा ब्लास्ट

 सुभाष नगर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी क्रमांक २१२ मध्ये शुक्रवारी सकाळी मोठा अपघात टळला. कॉलनीची जीर्ण अवस्था आणि बेभरवशीर परिसर यामुळे हा अपघात घडणार होता. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. यामुळे या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्थानिक रहिवाशांच्या मते, ही संपूर्ण वसाहत आता जंगलसदृश अवस्थेत रूपांतरित झाली आहे. ठिकठिकाणी वाढलेली झाडे, गवत्या झुडुपं आणि कचऱ्याचे ढिग हे दर्शवतात की, या वसाहतीची देखभाल वर्षानुवर्षे करण्यात आलेली नाही. कामगारांचा आरोप आहे की, वसाहतींच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखवला गेला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत. ठेकेदारांनी डब्ल्यूसीएल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उचलला, पण वसाहतीची अवस्था मात्र पूर्वीप्रमाणेच राहिली आहे.

एका संतप्त रहिवाशाने सांगितले, “इथे राहणं म्हणजे रोज धोका पत्करणं. कॉलनीची स्थिती बघितली, की वाटतं आम्हाला नियतीच्या हवाली केलं गेलंय.”

कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

1. सर्व वसाहतींची तातडीने आणि संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी.

2. दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

डब्ल्यूसीएल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर कामगार संघटनांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही घटना डब्ल्यूसीएलच्या कार्यपद्धतीवर तसेच कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये