जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी अनिवार्य करण्याचे निर्देश
आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश; गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. मात्र, त्यांची पोलीस पडताळणी न करता थेट कामावर घेण्यात येत असल्याने गंभीर गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी ही गंभीर बाब गृहमंत्र्यांना निदर्शनास आणून दिली होती. या मागणीची दखल घेत गृह विभागाच्या उपसचिवांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
औद्योगिक दृष्टिकोनातून चंद्रपूर हा महत्त्वाचा जिल्हा असून येथे बाहेरून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमृतसर येथील पोलीस चौकीवर हल्ला करणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्याला चंद्रपूर येथून अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीची शहानिशा करणे किती आवश्यक असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
आमदार अडबाले यांच्या मागणीची दखल घेत औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची नियुक्ती करताना पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात यावी व याबाबत सर्व पोलिस घटकांना सुचित करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहे.
आता जिल्ह्यातील सर्व उद्योगांनी परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक असेल. त्यांच्या ओळखीची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच त्यांना कामावर घेता येणार आहे. कंपन्यांनी अशा कामगारांची माहिती स्थानिक पोलीस विभागास सादर करणे अनिवार्य राहील.
या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवणे सुलभ होणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवता येणार आहे. आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.