जिवती येथे श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिराचे प्रथमच आयोजन
५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या जिवती येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पहिल्यांदाच श्रीगुरुदेव सुसंस्कार उन्हाळी शिबिराचे आयोजन या भागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. राष्ट्रधर्म प्रचार समिती आणि गुरुदेव सेवा मंडळ जीवती तालुका समितीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ प्रचारक सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी भेट देऊन शिबिरार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली जीवनमूल्ये याविषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. बोढेकर म्हणाले, आजच्या नव्या युगात वावरणाचे कौशल्य राष्ट्रसंताची ग्रामगीता शिकवते. जे युवक राष्ट्रसंताचे मानवतावादी ,परिवर्तनवादी विचारांचा स्विकार करेल तोच आपले भावी जीवन सुखी करू शकतो. युवकांनी तंबाखू,दारू सारख्या घातक व्यसनांपासून सदैव दूर राहावे, असे ते म्हणाले. जिवती सारख्या दुर्गम आदिवासी भागात शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्य संयोजक सुरेश चौधरी यांना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने मानवस्त्र व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच प्रश्नोत्तरात यशस्वी झालेल्या १२ शिबिरार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी महादेव हुलके, शिबिराचे युवा प्रशिक्षक म्हणून जयपाल राठोड, राकेश चौधरी, धीरज राठोड, गेडाम गुरूजी उपस्थित होते. संपूर्ण शिबिरासाठी तालुका सेवाधिकारी डॉ. अंकुश गोतावळे, आनंद कदम, रवी कांबळे, किसन गेडाम यांनी वेळोवेळी सहकार्य मिळते आहे.
तालुक्यातील पल्लेझरी, नानकपठार ,मारोती गुडा, शेनगाव, येळापूर, भारी, मरकलमेटा, लंबोरी इत्यादी गावातील विद्यार्थी सहभागी असून या शिबिरात या शिबिरार्थ्यांना लाठीकाठी, मल्लखांब, कराटे,भजन, कीर्तन ध्यान-प्रार्थना, श्लोक पाठांतर, रामधून आणि व्यक्तिमत्व विकास यासंबंधे प्रशिक्षण देण्यात येत आहे.