गडचांदूर शहरातील नाल्यांची तातडीने सफाई करावी
भा. ज पा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहन काकडे यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर – शहरात मान्सूनपूर्व नाल्यांची तातडीने सफाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे रोहन काकडे यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या नगरपरिषदेमार्फत “स्वच्छ शहर” अभियान राबवले जात असले तरी प्रत्यक्ष पाहणीअंती अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई न झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण होते आणि पाणी घरोघरी शिरून जनतेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होते. विशेषतः गरीब वस्तीतील नागरिकांना याचा फटका बसतो.
या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळा लक्षात घेता नाल्यांची तत्काळ व प्रभावी सफाई करून नागरिकांचे आरोग्य आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी नगरपरिषदने कोणताही हलगर्जीपणा न करता त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.