ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तब्बल 38 वर्षानंतर दरवळला आठवणींचा सुगंध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       सन 1987 मध्ये लोकमान्य विद्यालय भद्रावती येथून वर्ग 10 वी ची परीक्षा देऊन शाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणिंची कायमची ताटातूट झाली. मैत्र विरहात तब्बल 38 वर्ष घालविल्यानंतर बालपणीच्या जुन्या आठवणी मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यांनी आपल्या सर्व जुन्या मित्रांची माहीती गोळा करणे सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले व त्यांनी आपल्या मित्रांचा एक व्हाट्सॲप गृप तयार केला. या व्हॉट्सॲप गृपमध्ये सुमारे 100 विद्यार्थी जुळले आणि ईथुनच सुरू झाली त्यांच्या स्नेहमिलन समारंभाची जय्यत तयारी.

    दिनांक 27 एप्रिलला भद्रावतीच्या राजमनी गार्डन सभागृहात हा स्नेहमिलन समारंभ मोठ्या थाटा-माटात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. पांडुरंगजी चिडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ शिक्षक मा. के. एस. रावळे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक मा. भास्करराव पाटील उपस्थित होते. या समारंभाला लोकमान्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मा. विनोद पांढरे व ज्येष्ठ शिक्षक मा. मधुकरराव पारधे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

    या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. या शानदार समारंभात गुरू शिष्य भेटीचा देखील सुवर्ण कांचन योग साधल्या गेला. त्यामुळे उपस्थित मान्यवर शिक्षक देखील भारावून गेले. या प्रसंगी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना मा. पांडुरंगजी चिडे यांनी आपले बाल वयातले अनुभव विद्यार्थ्यांसमोर प्रकट केले. आपल्या भाषणात श्री चिडे म्हणाले की, “तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात त्याच शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे. तुमच्यावर ज्या शाळेने संस्कार केले त्याच शाळेने माझ्यावर देखील संस्कार केलेले आहे. जे संस्कार माझ्यावर झाले तेच संस्कार तुमच्यावर झालेले असल्या कारणाने मला माझ्या विद्यार्थ्यांचा मोठा अभिमान वाटतो आहे. आज आपल्यासमोर 38 वर्षानंतर बोलतांना मला अतिशय आनंद होतो आहे.”

      उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना ज्येष्ठ शिक्षक मा. के. एस. रावळे म्हणाले की, “आमचे विद्यार्थी समाजात आज विविध जबाबदाऱ्या मोठ्या ताकदिने आणि जबाबदारीने निभावत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक, अशा विविधांगी क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी समाजजीवणामध्ये आपली अमीट अशी छाप सोडली आहे. विविध महत्वाच्या पदावर आमचे विद्यार्थी शासन-प्रशासन व्यवस्थेत सेवा देत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांचा नावलौकीक जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवतो, तेव्हा आमची छाती अभिमानाने ताठ होते.”

       या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विशेष अतिथी मा. विनोद पांढरे म्हणाले की, “ शाळा ही विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा व उर्जा प्रदान करीत असते. त्यामुळे शाळेचे अनन्य साधारण असे महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. शाळा ही अनेक रत्नांना जन्म देणारी खान आहे आणि विद्यार्थी या खानीमधून बाहेर पडणारा कोहीनूर हिरा आहे.” असे मार्मिक विधान त्यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक मा. मधुकरराव पारधे सत्काराला उत्तार देतांना म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ ,देऊन जो सत्कार केला, हा सत्कार म्हणजेच आमची गुरूदक्षिणा असल्याचे प्रतिपादन केले. शाल म्हणजे गुरूजनांच्या संरक्षणाची हमी आणि पुष्पगुच्छ म्हणजे आनंदाचे प्रतिक. आज ईथे विद्यार्थ्यांचा आनंदमेळा भरला आहे. या आनंदमेळ्यात सहभागी होतांना आम्हाला देखील अतिशय आनंद होतो आहे.”

       यानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचा परीचय व मनोगत संपन्न झाले. त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये सर्व मित्र – मैत्रिणींचे मनोरंजनात्मक खेळ संपन्न झाले. सायंकाळच्या समारोप सत्रात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. या मध्ये नृत्य, गित गायन, कवितावाचन अशा विविधांगी कार्यक्रमाचा समावेश होता.

         या भव्य शानदार समारंभाचे उद्घाटन शारदास्तवनाच्या पार्श्वभूमीवर द्विपप्रज्वलन व ग्रंथपुजन करूण करण्यात आले. समारंभाला उपस्थित राहणे करीता पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर,राजुरा अशा विविध शहरातून व गावातून विद्यार्थी मित्र – मैत्रिणी आल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल धानोरकर यांनी केले तर, सुत्रसंचालन रत्नमाला मोकाशी (धुर्वे ) व प्रवीण आडेकर यांनी केले. आभार विलास माथनकर, प्रशांत बाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता भद्रावतीकर व चंद्रपूरकर मित्रांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये