
चांदा ब्लास्ट
इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी आहे. शहराला ९ कि.मी. समांतर वाहणा-या या नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. निरंतर ४५ दिवस सुरू राहणा-या या अभियानसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून नदीच्या खोलीकरणातून निघणारा गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येत आहे.
ज्या शेतक-यांनी गाळासाठी नोंदणी केली आहे, त्यांना मोफत गाळ वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने २४ शेतक-यांची नोंदणी झाली आज शेतक-यांना ७० ब्रास गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. सदर गाळ नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करायची आहे. सद्यस्थितीत अम्युझमेंट पार्क जवळ आणि महर्षी विद्या मंदीर शाळेमागे खोलीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी विविध विभाग आणि खाजगी असे एकूण २१ ट्रॅक्टर, १७ हायवा / टिप्पर, ७ पोकलेन मशीन आणि १ जेसीबी कार्यरत आहेत. ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या १७ कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने २५ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.
इरई नदी खोलीकरण मोहिमेत शासनाच्या जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन,वन विभाग,चंद्रपूर महानगरपालिका,कृषी विभाग,पाटबंधारे विभाग,भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग,पाटबंधारे विभाग,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे.