प्रशिक्षणाच्या अनुभवातून शासन सेवेत संधी मिळेल – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुर्ननियुक्ती आदेशाचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलिस विभागातील 60 प्रशिक्षणार्थ्यांची पुर्ननियुक्ती
वर्धा, :प्रत्येक युवक व युवती शासकीय सेवेमध्ये संधी मिळावी, असे स्वप्न बाळगून असते. यासाठी ते युपीएससी व एमपीएससी ची तयारी करतात. प्रत्येकाला संधी मिळण्याची अपेक्षा असते. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करून शासकीय सेवेत संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रशिक्षणाच्या अनुभवातून त्यांना मोठा अनुभव मिळाला आहे. या अनुभवातून शासकीय रोजगाराची संधी मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पोलिस विभागातील युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुर्ननियुक्ती आदेशाचे वितरण प्रसंगी ते बोलत होते.
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यावरुन 11 महिन्याचा करण्यात आला आहे. पोलिस विभागात सहा महिण्यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील पाच महिण्यांकरिता पुर्ननियुक्ती आदेश देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस उप अधीक्षक पुंडलीक भटकर, पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1600 युवक व युवतींना शासनाच्या विविध आस्थापनामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.पुर्वी 6 महिण्याचे प्रशिक्षण होते. मात्र युवकांनी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा व त्यांना आणखी शिकण्याची संधी मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी मार्फत केली होती. याच दखल घेत शासनाने प्रशिक्षण कालावधी 5 महिण्यांनी वाढविला आहे.पोलिस विभागात कार्य करण्याची संधी युवकांना मिळाला. हा अनुभव त्यांना जीवनात कामी पडेल, असे ही ते म्हणाले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले की, वर्धा पोलिस विभागातील विविध शाखेतील कामाचा अनुभव घेण्याकरीता विभागात मंजूर पदातील रिक्त असलेल्या पदापैकी 5 टक्के पदाकरीता 88 युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या 88 प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी दि.२४ फेब्रुवारी रोजी संपुष्ठात आला होता. या संपुष्ठात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी 60 प्रशिक्षणार्थ्यांना पुर्ननियुक्ती आदेश देण्यात आले आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या युवक व युवतींचे विभागाला चांगेल योगदान मिळाले असून त्यांना सुद्धा अनेक बाबी शिकण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी पोलिस विभागास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने वर्धा, हिंगणघाट व देवळी येथे शहरातीत विविध परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरीता 10 करोड 56 लाख 84 हजार 408 रुपयाचा निधी तसेच 1 कोटी 17 लाख 42 हजार 50 रुपये किमतीचे 10 वाहने प्राप्त झाल्या बद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन स्मिता महाजन यांनी तर आभार पुंडलीक भटकर यांनी मानले.
प्रशिक्षणातून खुप शिकण्यास मिळाले
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या शोधात होतो. आयटी सेक्टर मध्ये अनेक प्रयत्न केले. परंतु अनुभव नसल्याचा दाखला देत नोकरी मिळण्यास अडचण येत होती. या योजनेमुळे सायबर सेल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यातून बरेच काही शिकायला मिळाले. आता अनुभव मिळाला आहे. या अनुभवातून संधी नक्की मिळेल.
शुभम चावरे प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षण भविष्यात उपयोगी पडेल
प्रशिक्षणातून पोलिस विभागातील कामकाज पद्धती शिकण्याची संधी मिळाली.या प्रशिक्षणाचा भविष्यात मोठा लाभ मिळणार आहे. शासकीय कार्यालयाचे कामकाज कसे असते. किती दडपण असते याचा देखील अनुभव मिळाला.
अंकीता खेलकर प्रशिक्षणार्थी
सायबर सेलचे कार्य अतुलनिय
प्रशिक्षणा दरम्यान सायबर सेल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. नागरिकांना कसे फसविल्या जाते व ते कसे बळी पडतात याचा अनुभव आला. सायबर सेल चे कार्य खुप मोठे आहे. या सेल मध्ये काम करीत असताना विभाग गुन्हयाचा कसा माग घेतो. याचा अनुभव आला. हा अनुभव आयुष्यात कामी पडणार आहे.
सजल वरघणे प्रशिक्षणार्थी