ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस: खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर): घुग्घुस बस स्थानक ते टेंपो क्लब आणि राजीव रतन चौक ते मातरदेवीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर दररोज अपघात घडत असून, त्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे.

राजीव रतन चौक येथे आर. के. मदानी कंपनीकडून उड्डाणपुलाचे (फ्लायओव्हर) काम सुरू आहे, परंतु हे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आर. के. मदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ६ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी स्पष्ट केले की, जर ६ दिवसांत ग्रेडर मशीनने रस्ता वाहतुकीस योग्य न बनविला आणि नागरिकांना धुळीपासून वाचवण्यासाठी नियमित पाणी मारले नाही, तर कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

उड्डाणपुलामुळे वाढलेली समस्या

हा रस्ता चंद्रपूर-पुणे महामार्गाचा भाग असल्याने येथे कायमच मोठी वाहतूक असते. घुग्घुस येथील वेकोलीच्या मुख्य वसाहतीही या भागात असल्यामुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध, कर्मचारी, व्यापारी आणि महिला यांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्त्याचा एक भाग पूर्णतः बंद आहे, त्यामुळे वाहतूक एकमार्गी झाली असून, सतत जाम लागत आहे.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:

ग्रेडर मशीनने पूर्ण रस्ता तत्काळ वाहतुकीस योग्य बनवावा.

रस्त्यावर धूळ कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी मारले जावे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास रुग्णवाहिकेची सोय करण्यात यावी.

जर या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर काँग्रेसने कंपनीविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी काँग्रेस नेते सय्यद अन्वर, जिल्हा महासचिव अलीम शेख, तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, अभिषेक सपडी, सुनील पाटील, अंकुश सपाटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये