ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यात्रा परिसरातील दुकानदारांसाठी सोयीसुविधा वाढवण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांचे निर्देश.

दुकानदारांची भेट घेत केली यात्रा परिसरातील व्यवस्थेची पाहणी

चांदा ब्लास्ट

आजपासून महाकाली मातेच्या चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आज आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रा परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी दुकानदारांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेवर रोषणाई आणि इतर सुविधा करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, संतोष गडर्गेलवार, शहर अभियंता विजय बोरिकर, नगर सचिव बोबाटे, शहर स्वच्छता अधीक्षक डॉ. अमोल शेडके, शाखा अभियंता आशिष भारती, राहुल भोयर, देवतळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, प्रकाश देवतळे, मनोज पाल, अमोल शेंडे, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, संजय महाकालीवार, कुमार जुनमुलवार आदी उपस्थित होते.

चैत्र महिन्यात दरवर्षी भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज यात्रा परिसरात भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी यात्रेत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. दरवर्षी यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक आणि व्यापारी येथे येतात. यामुळे वाहतूक कोंडी आणि असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर यंदा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्था करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यात्रेतील कोणत्याही भाविकाला किंवा दुकानदाराला अडचण होणार नाही, याची दक्षता घेत नियोजन करण्यात आले आहे. यात्रा परिसरातील दुकानांसाठी 850 व्यापाऱ्यांना विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी मंदिर परिसरातच दुकाने लावली जात असल्याने वाहतुकीवर परिणाम होत होता. त्यामुळे भाविक आणि दुकानदारांची सोय लक्षात घेऊन यात्रा परिसरात स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसरातील गर्दी कमी होईल आणि यात्रा अधिक सुरळीत पार पडेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले असून, यात्रेतील सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी संपूर्ण यात्रा नियोजन प्रभावीपणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दुकानदारांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेवर योग्य व्यवस्था करण्यात यावी, तेथे प्रकाश व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय असावी, प्रत्येक दुकानावर फलक लावण्यात यावेत, खानावळ दुकानदारांना मोठी जागा उपलब्ध करून द्यावी, या सर्व सोयींकडे लक्ष ठेवण्यासाठी व्यापार्यांनी ११ लोकांची समिती गठीत करावी अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये