घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
मोफत रेती वाटपाची शासनाची योजना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत रेती मोफत म्हणजेच रॉयल्टीशिवाय मिळणार आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना केवळ वाहतुकीचा खर्चच करावा लागणार आहे, तर रेतीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
या योजनेअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील 3000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना सुमारे 7500 ब्रास रेतीचे मोफत वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1183 लाभार्थ्यांना 4040 ब्रास रेती देण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
अर्ज किंवा कार्यालयात येण्याची गरज नाही
या योजनेची खास बाब म्हणजे लाभार्थ्यांना अर्ज करण्याची किंवा तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. ग्रामपंचायत सचिवाच्या माध्यमातून रॉयल्टी परवाना घरपोच दिला जाईल. लाभार्थ्याने फक्त हा परवाना, आधार कार्ड आणि मोबाईल फोन घेऊन संबंधित रेती घाटावर जावे आणि विहीत कालावधीत रेती घेऊन यावी.
ठरवलेले रेती घाट
चंद्रपूर तालुक्यातील खालील आठ रेती घाट या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत:
वर्धा नदी पात्रातील: शिवनीचोर, मार्डा, वढा, घुग्घुस, बेलसणी,.
अंधारी नदी पात्रातील: चेक निंबाळा, चक पिंपळखुट, अजयपूर.
समितीची स्थापना
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार विजय पवार हे समितीचे अध्यक्ष असून, मुख्याधिकारी निलेश रांजणकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी श्रीमती भांगरे हे सदस्य आहेत, तर नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
अनधिकृत रेती खरेदीला आळा
या योजनेमुळे घरकुलधारकांना पूर्वीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातून रेती आणावी लागत नव्हती किंवा अवैध रेती तस्करांकडून महागात रेती खरेदी करावी लागत होती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक खर्चात मोठी कपात होणार आहे.
या उपक्रमामुळे चंद्रपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शासनाचा हा निर्णय खरोखरच लोकहिताचा आणि गरजूंसाठी उपयुक्त ठरणार आहे.