ताज्या घडामोडी

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात स्नेहसंमेलन संपन्न – विद्यार्थिनींनी घेतला विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग

बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या दशकपूर्ती निमित्त होणार विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

दुर्बल, दुर्गम भागातील आदिवासी समाजाला देशाच्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना आखल्या जातात. ह्या समाजातील मुलामुलींना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वसतिगृहाची निर्मिती जवळपास प्रत्येक तालुक्यात करण्यात आली असुन याठिकाणी शिक्षण घेऊन अनेक प्रतिभावंत आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रगती केली असुन भावी काळात ह्या माध्यमातून विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

ह्याचाच भाग म्हणून राजुरा येथिल आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुले व मुलींच्या शासकीय वसतिगृहात क्रिडा  स्पर्धा तसेच स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ह्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेऊन आपल्या अंगभूत कौशल्याचे प्रात्यक्षिक दाखविले. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो, त्यामुळे खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. खेळामुळे शरीराची ताकद वाढते, चपळता वाढते आणि मानसिकता प्रबळ होते. खेळामुळे शिकण्याची मूलभूत गरज पूर्ण होते ह्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात मुला मुलींचे क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, गोळा फेक, पोता लावणी, चमचा गोळी, बुद्धिबळ, हांडी फोड, संगित खुर्ची असे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. सदर खेळामध्ये विजयी ठरलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन प्रोत्साहित  करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुलांचा वसतिगृहाचे गृहपाल धोडरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते झाले. क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन राजुरा तालुक्याचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौंड, पालक किरण कुमरे, शितल आत्राम, मुलीच्या वस्तीगृहाच्या गृहपल गाजर्लावार, विशाल दवंडे, विकास गेडाम उपस्थित होते. महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. क्रिडा स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पदक, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वसतिगृहात राहून शिक्षण प्राप्त करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीवर लागलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटक विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुने डॉ. ओमप्रकाश गौंड तहसिलदार राजुरा यांनी स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष धोडरे गृहपाल यांनी देखील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक स्नेहा मडावी हिने केले. संचालन स्विटी आत्राम व गौरव वेलादी यांनी केले. रात्री सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले यात एकल नृत्य, सामुहिक नृत्य, नाटक, वेशभुषा घेण्यात आले. मोठया संख्येने वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाची सुरुवात

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतीना प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुर्तीचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दिनांक 22/01/2025 रोजी 10 वर्ष होणार असल्याने, राज्यात 22/1/2025 ते 08/03/2025 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन ह्या अंतर्गत 22/01/2025 रोजी आदिवासी मुलींचे शासकिय वसतीगृह राजुरा येथे पोस्टर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे विदयार्थीनींनी शहरातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. याप्रसंगी मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल जे. ए. गाजर्लावार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मुलींच्या जन्मानंतर  कुटुंबीयांनी आनंद साजरा करावा, स्त्री भ्रूणहत्या होऊन नये ह्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, मुलगा – मुलगी भेद न करता मुलींना देखील सन्मानाने जिवन जगता यावे यासाठी मुलींना उच्च शिक्षण द्यावे जेणेकरुन मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल, मुली शिकल्यामुळे संपूर्ण कुटुंबचा प्रगती व विकास तर होतीच पण त्यामुळे गावाचा, जिल्हाची व देशाची प्रगती होते त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आदर्श निर्माण करावा असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये