ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सावली तालुक्यातील मेहाखुर्द या लहानशा गावाने सामूहिक वनहक्क क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे. मेहाखुर्द गावाला वनहक्क कायद्यानुसार ५५.८८ हेक्टर जंगल क्षेत्र मिळाले असून, या क्षेत्राच्या संवर्धन व व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला आहे. यामुळे जंगलाचे पुनरुज्जीवन आणि गावकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ग्रामसभा मेहाखुर्दने नरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत ग्रामपंचायत मगरमेंढा, पंचायत समिती सावली, आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई (TISS) यांच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या अंतर्गत १० हेक्टर वनहक्क क्षेत्रावर जांभूळ, सीताफळ आणि बांबू या ५००० रोपांची यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे. यातील ३००० फळझाडांचे आणि २००० बांबूचे रोप आहेत. या लागवडीच्या माध्यमातून मेहाखुर्द गावाने पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आह.
या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक रोजगाराची निर्मिती. या वृक्षलागवड मोहिमेमुळे गावातील जवळपास ४० कुटुंबांना रोजगार संधी उपलब्ध होत आहे. विशेषतः महिलांना याचा अधिक फायदा झाला आहे, कारण पिक काढणीनंतर कामाच्या शोधात बाहेरगावी स्थलांतर करावे लागत होते. परंतु, या वृक्षलागवडीमुळे महिलांना गावातच काम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे अन्य जिल्ह्यांमध्ये होणारे स्थलांतर थांबले आहे.
मेहाखुर्द गावातील या उपक्रमामुळे जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन होऊन पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, फळझाडे व बांबूच्या लागवडीमुळे गावकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वनहक्क क्षेत्राच्या व्यवस्थापनातून होणारे आर्थिक फायदे गावाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा करतील. विशेषतः महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल.
“वनहक्क क्षेत्रामध्ये फळबाग व बांबू लागवडीमुळे जंगलाचे संवर्धन होईलच, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे स्थलांतरावर आळा बसू शकतो,” असे मत संशोधन अधिकारी नितीन ठाकरे (टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई) यांनी व्यक्त केले आहे.