ताज्या घडामोडी

वन विभागाच्या संवेदनशीलतेने आदिवासी समाज संतप्त – तुटपुंजी मदत करताना फोटो काढून प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रकार निंदनीय

मृत आदिवासी व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन टप्प्यात मदत - वाघाने घेतला होता इसमाचा बळी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील विरूर वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक 126(1) कोष्टाळा येथिल जंगू रामू आत्राम (50 वर्ष ) राहणार बगलवाही या शेतकऱ्याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सदर आदिवासी इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाला असल्याचे प्राप्त परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र ह्या इसमाच्या कुटुंबियांना नियमानुसार आर्थिक मदत करताना वनविभागाने दाखविलेल्या असंवेदनशीलतेमुळे आदिवासी समाज संतप्त झाला असुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोष्टाळा  येथिल 50 वर्षीय जंगु रामू अत्राम हा आदिवासी शेतकरी कापुस वेचण्यासाठी आपल्या शेतात गेला होता मात्र चार पाच दिवस लोटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीय त्याच्या शोधात होते मात्र त्याचा सुगावा लागत नसल्याने ते चिंतेत होते. दरम्यान त्या इसमाची बहिण शेतात गेली असता तिला दुर्गंधी आल्याने तिने शेतात शोध घेतला असता सदर इसमाचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळुन येताच तिने कुटुंबीय व गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली.

ही बाब कळताच सर्वांनी शेताकडे धाव घेऊन तो मृतदेह जंगू आत्राम ह्याचाच असल्याची खातरजमा करून वन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी पवनकुमार जोंग, सहाय्यक वनसंरक्षक तथा परिविक्षाधीन अधिकारी प्रकाश अवधुतवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहाय्यक डि. एम. गेडाम व वनकर्मचारी, विरुर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मोका पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला.

मात्र सदर मृत्यु वाघाच्या हल्ल्याने झाला असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याने तसेच डाव्या हाताला व मानेच्या खाली घाव आढळून आल्याने त्याचप्रमाणे सदर मृतदेह वाघाने पन्नास ते शंभर फूट अंतरावर फरफटत नेल्याचे सुद्धा आढळून आल्याने गावकऱ्यांनी मृतदेह हलविण्यास नकार देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. अखेरीस वन विभागाने पिडीत कुटुंबियांना अंत्यविधीसाठी 25000/- हजारांची आर्थिक मदत करण्याचे मान्य केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.

वनविभागाने केली मृतकाच्या परिवाराची थट्टा

जंगु रामू आत्राम ह्याचा मृतदेह राजुरा येथे आणल्यानंतर वनविभागाने मृतकाच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी 25000/- रुपये रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते मात्र उपजिल्हा रुग्णालयात वन विभागाने पिडीत कुटुंबाला 15000/- रुपयांची रोख मदत देऊन उर्वरित 10000/- रुपये बँक उघडल्यावर सोमवारी देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबीयांची बोळवण केली. वास्तविक बघता वन विभागाचे अधिकारी – कर्मचारी यांच्यापैकी कुणीही अशा परिस्थितीत एटीएम मधुन आपल्या खात्यातून उर्वरित 10000/- रुपयांची भर घालुन पिडीत कुटुंबियांना संपुर्ण मदतनिधी देऊ शकले असते व ही रक्कम बँक उघडल्यावर परत घेऊ शकले असते मात्र वन विभागाच्या संवेदनशीलतेने आदिवासी कुटुंबियांना दुःखद परिस्थितीतही अवहेलना सहन करावी लागली.

 

मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करताना फोटो घेण्याची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनोवृत्ती देखिल संतापजनक असुन मदत देताना कर्मचाऱ्याने कुटुंबियांना दवाखान्याच्या प्रांगणात एकत्र करून मदत दिली व त्याचे फोटो काढून वन विभागाने प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांना पाठविले. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करताना फोटो काढण्याऐवजी सक्षम अधिकाऱ्यांनी गावातील जबाबदार व्यक्तिसमक्ष त्यांची स्वाक्षरी घेऊन निधी सुपूर्त करणे योग्य ठरले असते मात्र मदत स्वीकारताना फोटो घेऊन ते प्रसिद्धीस देऊन वन विभागाने पिडीत कुटुंबीयांचा मानभंग केल्याची आदिवासी समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वन विभागाची कृती अत्यंत संतापजनक असुन आदिवासी समाजाचा अपमान करणारी आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या प्रयत्नात अधिकारी व कर्मचारी आपली संवेदना हरवून बसल्याचे दिसत असुन समग्र आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी टायगर सेना वन विभागाच्या कृत्याचा निषेध करीत असुन वरिष्ठांनी ह्या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे व असे न झाल्यास आदिवासी टायगर सेना तीव्र आंदोलन करेल.

ॲड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष आदिवासी टायगर सेना

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये