आपल्या डोक्यातील सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांनी नेहमी अपडेट ठेवले पाहिजे – प्रा. सुरेश चोपणे
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरविले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यातील सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवले पाहिजे. ते जर जुने झाले तर आपले डोके काम करणार नाही. ज्ञानी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जगले पाहिजे,आपण जी माहिती घेतो त्याचे जर कृतीत रूपांतर झाले तरच ते ज्ञान कामाचे राहू शकते.अज्ञान,अंधश्रद्धेतून जो व्यक्ती बाहेर निघतो तोच व्यक्ती चिकित्सक बनतो, ज्ञानी बनतो.सर्व गोष्टीच्या ज्ञानाचे सॉफ्टवेअर आपल्या डोक्यात आहे परंतु हे सॉफ्टवेअर जर चुकीचे असले तर आपण फसतो आपली फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. शिक्षकांनीही तो विद्यार्थ्यांमध्ये रुजविला पाहिजे असे प्रतिपादन खगोल, भूशास्त्र,पुरातत्व,पर्यावरण व इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतातून केले.यावेळी विज्ञान, भूगोल, इतिहास, पर्यावरण यासारख्या विषयावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक व सविस्तर उत्तरे देऊन प्रा चोपणे यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण करीत त्यांच्या ज्ञानात भर घातली.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर येथे एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष डॉ.आनंदरावजी अडवाले होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपल्या जीवनाला आकार द्यावा व आपले जीवन यशस्वी करावे.त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता विद्यार्थ्यांनी कठीण आव्हाने स्वीकारावीत असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे व कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत खैरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. नितीन सुरपाम यांनी केले तर आभार प्रा.राजेश बोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा अशोक सातारकर, प्रा जहीर सय्यद,प्रा दिनकर झाडे, प्रा सोज्वल ताकसांडे, प्रा जयश्री ताजने, प्रा प्रवीण डफाडे,प्रा शिल्पा ताजने,प्रा कविता गहूकर,स्नेहल चांदेकर, सीताराम पिंपळशेंडे तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.