ऐन दिवाळीत घर जळुन भस्मसात – मुलासह महिलेचा संसार उघड्यावर
आगीमुळे घरातील सर्व साहित्य झाले खाक - खाण्यास अन्नाचा दाणाही उरला नाही

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बामनवाडा ग्राम पंचायतीच्या हद्दीतील मेश्राम ह्यांच्या घरी आपल्या मुलासह किरायाने राहणाऱ्या रजनी खानोरकर ह्या महिलेच्या खोलीला 2 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत महिलेच्या घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले असुन ऐन दिवाळीत घडलेल्या ह्या घटनेने त्या महिलेचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परिसरातील रहिवाशांना रजनी खानोरकर ह्यांच्या खोलीतून धुर निघताना दिसताच त्यांनी घराकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेजाऱ्यांनी मोठ्या हिमतीने घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात विशेष यश आले नाही.
ही आग इतकी झपाट्याने पसरली की त्या महिलेच्या घरातील कपड्यांसह सर्व साहित्य तसेच अन्नधान्य जळुन खाक झाले असुन दिवाळीच्या दिवसांत कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचल्याने आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले असले तरीही घरातील सर्व साहित्य जळाल्याने महिलेवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेजारी राहणाऱ्या सुनिल चिंचाळकर ह्यांचेसह अंगद नगर परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन महिलेला मदतीचा हात पुढे केला असुन महसूल प्रशासनाने 3 नोव्हेंबर रोजी पंचनामा केला असला तरीही सायंकाळपर्यंत प्रशासनामार्फत त्या महिलेला कुठलीही मदत शासन स्तरावरून करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला असुन तहसील प्रशासन असंवेदनशील असल्याचे मत व्यक्त केले आहे.