दोन वाघांची शिकारप्रकरणी बावरीया टोळीच्या पाच जणांना अटक
यापूर्वी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती

चांदा ब्लास्ट
वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील राजोली फाल येथे सहा महिन्यांपूर्वी दोन वाघांची शिकार झाली होती. या प्रकरणी सावली वनविभागाने गुवाहाटी येथून बावरीया टोळीच्या आणखी पाच जणांना अटक केली आहे. यापूर्वी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती.
अर्जुनसिंग प्यारेसिंग कुरडीया (३९), ओमप्रकाश कुरडीया (४५), रामदास गोपी कुरडीया (४०), मायादेवी कुरडीया (५०), राजवती ओमप्रकाश कुरडीया (४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी परिसरातील वाघाची शिकार झाली होती. दरम्यान, गुवाहाटी येथे वाघाच्या कातडीसह आरोपींना पकडल्यानंतर या शिकारी टोळीने सावली तालुक्यातील राजोली फॉल येथील दोन वाघांची शिकार केल्याचे समोर आले आले होते.
त्याआधारावर पूर्वीच कारागृहात असलेल्या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर एका महिलेला अटक केली होती. आता आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.