महिला व पुरुष पोलिसांना महिला ब्राम्हण सभेच्या सदस्यांनी बांधले रक्षासुत्र
राखी बंधन म्हणजे सुरक्षेचे अभिवचन व विश्वासाचे बंधन - महिलांची हृदय भावना
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
बहिण भावाच्या अतूट नात्याचा, त्यांच्या संरक्षणाचा तसेच विश्वासाचे प्रतिक असलेला सण म्हणजे राखी. भारतीय परंपरेत ह्या सणाला विशेष महत्त्व असुन परंपरेने भावाने बहिणीच्या व बहिणीने भावाच्या रक्षणाची, त्यांच्या सुरक्षेची, आरोग्याची तसेच भावनांची आनंदाने घेतलेली जबाबदारी व्यक्त करण्याचा हा उत्सव.
राजुरा महिला ब्राम्हण सभेच्या सदस्य नेहमीच नवनविन उपक्रम व उत्सव साजरे करत असतात त्या अनुषंगाने रक्षा बंधनाचे औचित्य साधुन महिलांनी केवळ भावांनाच नव्हे तर भगिणींनाही रक्षा सूत्र बांधण्याचा संकल्प केला. कालची अबला आता सबला झाली आहे ह्याची पदोपदी प्रचिती देण्याचे कार्य महिला पोलिस सदोदित करत असतात त्यामुळे केवळ भाऊच नव्हे तर भगिनीही बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी तेव्हढ्याच ताकतीने पेलत असल्यामुळे महिला पोलिसांनाही रक्षासुत्र बांधण्याचा मानस घेऊन ब्राम्हण सभेच्या महिलांनी ठाणेदार योगेश्वर पारधी हयांचेशी संपर्क साधुन महिला पोलिसांनाही रक्षासुत्र बांधण्याचा मनोदय व्यक्त करताच भारावलेल्या ठाणेदरांनी तत्काळ रक्षाबंधनाच्या उत्सवास परवानगी दिली.
परवानगी प्राप्त होताच महिला ब्राम्हण सभेच्या महिलांनी बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी राजुरा पोलीस ठाण्याच्या सभागृहात ठाणेदार पारधी ह्यांचेसह महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षासूत्र बांधून कार्यक्रमाची सुरुवात केली व ठाण्यात उपस्थित सर्व पोलीस बंधुंनाही राखी बांधून बंधुत्वाचे, विश्वासाचे रक्षणाचे पर्व उत्साहात साजरे केले.
अल्का सदावर्ते ह्यांच्या प्रास्ताविकाने सुरू झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी महिला ब्राह्माण सभेच्या सचिव पूजा घरोटे, अनुष्का रैच, श्वेता अपराजित, नम्रता खोंड, सगुणा अवधुत, वैजयंती देशकर, ऋचा देशपांडे, राधिका धनपावडे, सुप्रिया भावे, प्रीती समर्थ, कीर्ती भावे उपस्थित होत्या.