ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट – संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

इरई धरणाचे दोन दरवाजे उघडणार - अनेकांच्या घरात पाणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून वरुणराजाने दमदार उपस्थिती लावली असुन जिल्ह्यात सर्वत्र होणाऱ्या संततधार पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर विविध ठिकाणी प्रशासनाचा गलथानपणा उघड होत असुन ह्याचा नाहक त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने राजुरा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती कक्षात तसेच नवजात शिशु विभागात तळे साचल्याचे चांदा ब्लास्ट ने उघडकीस आणताच दुसऱ्याच दिवशी नगर पालिकेने परिसरात नाले सफाई करून काही प्रमाणात दिलासा दिला मात्र मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने राजुरा तालुक्यातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. तालुका मुख्यालयापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असलेल्या बामनवाडा येथिल दसवारू नाल्याशेजारी असलेल्या घरांत 3 ते 4 फुट पाणी साचले, काही ठिकाणचे रपटे वाहुन गेल्याने नागरिकांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे.

चंद्रपूर शहरात देखिल विदारक चित्र बघायला मिळत असुन पोलीस मुख्यालया जवळ असलेल्या उड्डाण पुलापासून तर थेट वाहतूक विभाग कार्यालय व तुकुम भागात प्रचंड पाणी रस्त्यावर साचले असुन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना आपली वाहने काढण्यास समस्या निर्माण होत असुन पावसाच्या पाण्याबरोबर गटाराचे पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना घाणीतून वाट काढावी लागत आहे. अशीच परिस्थिती शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या कस्तुरबा मार्गावर देखिल अनुभवायला मिळत असुन आझाद बागीच्याच्या मागच्या भागात रस्त्यावर चक्क गुडघाभर पाणी साचले आहे.

दुसरीकडे इरई नदीचा जलस्तर वाढत असल्याने रहमत नगर तसेच पठाणपुरा भागात घरांत पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच इरई धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने खरबदरीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असुन दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे उघण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर दरवर्षी प्रमाणे यंदाही रहमत नगर, स्वावलंबी नगर परिसरात नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता महानगर पालिका प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला असुन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याबाबत सुचना केल्या आहेत.

इराई धरणाने 205.750 मी पातळी गाठलेली असून 20 जुलैला दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार आहे. त्यामुळे पद्मापुर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंत नगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिंचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुरला, विचोडा बुजुर्ग, अंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराला, हिंगनाळा, चिंचोळी, मिणगाव, वडगाव, चंद्रपूर आणि माणा आणि नदीजवळ असलेल्या गावांना धोका आहे. नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर रहावे, तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता, नदी पात्रापासून दूर ठेवावी, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा वित्त हाणीला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये