सुरजागड वरून येणाऱ्या लोहखनिज वाहतूक करणारा ट्रकने पंचवीस वर्षीय युवकांचा घेतला जीव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
मुन्ना खेडकर
बल्लारपूर :- विसापुर येथिल बॉटनिकल गार्डन बघुन घरी परत असताना कोठारी जवळील पुलाशेजरी असलेल्या फळांच्या दुकानाजवळ आल्लापल्ली येथिल सुरजागड लोहखनिज खाणीतील कच्चा माल भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रेमदास सरवर (25) हा युवक जागीच ठार झाला तर सोबत असलेला त्याचा मावसभाऊ मयूर नागोसे (20) गंभीर जखमी झाला असुन त्याचे दोन्ही पाय मोडल्याने त्याला चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रेमदास सरवर व मयूर विशवनाथ नागोसेहै दोघेही विसापुर येथिल बॉटनिकल गार्डन बघुन 4:15 वाजताच्या सुमारास घरी जाण्याकरिता निघाले. जवळपास 5 वाजताच्या सुमारास ते कोठारी जवळ पोहचले असता नाल्यावरील पुलाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या लोहखनिज भरलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ह्या धडकेमुळे दुचाकी चालक प्रेमदास सरवर उसळून ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याच्या कमरेच्या वरच्या भागाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या तर सोबत असलेल्या मयूर नागोसे ह्याचे पाय मोडले.
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक मुळे ह्या मार्गावर अनेकदा अपघात झाले असुन कित्येक निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. मात्र असे असूनही वाहतूक विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघातांची मालिका सुरूच असुन अनिर्बंध, क्षमतेपेक्षा जास्त व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहतूक कंपन्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून कित्येक कुटुंब उघड्यावर पडत आहे. ह्या सर्व घटनांना पोलीस व परिवहन विभागाकडून दुर्लक्षिले जात असुन ह्यामागे अर्थपुर्ण संबंध असल्याची शंका नागरिकांना येत असुन लवकरात लवकर ह्यावर उपाययोजना न केल्यास जनता रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.