विजेच्या लपंडावाने जिवतीच्या नागरिकांचे प्रचंड हाल
'ना पाऊस, ना वारा, फक्त घामाच्या धारा', म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती : – सध्या पावसाळा जवळ आला असला, तरी यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसोबत नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे जिवती शहरात व ग्रामीण भागात विजेचा सतत लपंडाव सुरू असतो. त्यामुळे ‘ना पाऊस, ना वारा, फक्त घामाच्या धारा’, असे म्हणण्याची वेळ
नागरिकांवर आली आहे. जिवती तालुका अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील वीजपुरवठा रात्री-बेरात्री वारंवार खंडित होत असतो. दररोज विजेच्या लपंडावाने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लाईनमनची नियुक्ती करण्यात आली नाही. एकाच लाईनमनकडे अनेक गावे असल्यामुळे खंडित वीजपुरवठा वेळेवर दुरुस्त होत नाही. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. थोडा पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित, वीजपुरवठ्याने तालुक्यातील शहरी, ग्रामीण भाग व अतिदुर्गम भागांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसात तर विजेची समस्या नित्याचीच बाब ठरली आहे. थोडा पाऊस आला किंवा वाऱ्याचा जोर वाढला, तरी वीजपुरवठा खंडित केला जातो. अनेकदा पाऊस, वारा काहीच नसतानाही वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसा, रात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
◆ डासांचा प्रचंड त्रास
सध्या डासांची संख्या वाढली असून वीजपुरवठा खंडित होताच डासांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या समस्येची दखल घेत नसल्याने वीजग्राहकांनी महावितरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण, ही समस्या आता केवळ जिवती शहरापुरती मर्यादीत नसून तालुकाभर वाढीस लागली आहे. विजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिकांना विजेचा पुरेपूर वापर करता येतो का, हाच खरा प्रश्न आहे.