स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटरमुळे राज्यातील 15 ते 16 हजार कर्मचारी होणार बेरोजगार
मीटर रीडर संघटनेतर्फे निर्णय रद्द करण्याची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
महावितरणने आता वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे विद्युत मीटरचे रिडिंग घेणारे व विद्युत बिलाचे वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा विचार करता यावर उपाययोजना करण्याची मागणी एमएसईडीसीएल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सावली महावितरण च्या सहाय्यक प्रभारी अभियंता महाडोळे मॅडम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे कामगार संपूर्ण राज्यभरात महावितरण कंपनीमार्फत नियुक्त विविध एजन्सीमार्फत १५ ते १६ हजार कामगार हे मीटर रिडिंग तसेच वीज बिल वाटपाचे काम मागील १५ ते २० वर्षांपासून करीत आहेत. परंतु केंद्र व राज्य सरकार व महावितरण कंपनी संपूर्ण राज्यभर स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे धोरण राबवीत आहे. काही
शासकीय कार्यालयांमध्ये मीटर लावण्याचे काम सुरू झाले आहे.
त्यामुळे राज्यभरातील सर्व मीटर रीडर व वीज बिल वाटप करणारे कामगार यांच्यावर भविष्यात उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट प्रीपेड मीटर लागल्यानंतर मीटर रिडिंग करणे तसेच वीज बिल वाटप करण्याचे काम हे बंद होणार असल्याने व तसे झाल्यास संपूर्ण राज्यभरातील पंधरा ते सोळा हजार कामगारांवर बेरोजगार होण्याची पाळी येणार आहे.
हा निर्णय रद्द करण्यासाठी संघटनेचे सदस्य रोशन तासुलवार, प्रफुल श्रीगिरवार, भगवान लाडे, अरविन्द भैसारे या कामगारांनी महावितरण मार्फत शासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.