ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तरुणांनी मनावर संतुलन ठेऊन वाहन चालवावे – विवेक देशमुख

राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 भारतात सर्वात जास्त मृत्युचे प्रमाण वाहन अपघाताने होत असल्याचे निर्दशनास येत आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये तरुण वर्गाची संख्या मोठी आहे. तरुणांनी वाहन चालवितांना मनावर संतुलन ठेवणे गरजचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप प्रसंगी केले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने दि.1 ते 31 जानेवारी या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप आज यशवंत महाविद्यालय येथे करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीष ठाकरे, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या यांत्रिकी विभागाचे प्रताप राठोड, वाहतुक पोलीस उपनिरिक्षक सुचिता मांडवले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे आदी उपस्थित होते.

कुठल्याही गुन्ह्याचा हेतू नसंताना निष्काळजीपणे वाहन चालविणे हा सुध्दा गुन्हा ठरतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अमुल्य असतो. त्यामुळे वाहन चालवितांना वेगावर मर्यादा ठेवून वाहन चालवावे. समोरच्या वाहनाशी स्पर्धा करुन आपल्या सोबत दुर-यांचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी आजच्या युवा पिढींनी घ्यावी, असे पुढे बोलतांना विवेक देशमुख म्हणाले.

नागरिकांनी वाहन चालवितांना रस्ता वाहतुकीच्या नियमाचे पालन करुन वाहन चालवावे. अपघात घडल्यास अपघात गस्ताना मदतीसाठी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन करुन मदत घ्यावी जेणेकरुन अपघात जखमी झालेल्या व्यक्तींचा जीव वाचविण्यास मदत होईल. असे डॉ. सुमंत वाघ म्हणाले.

जीवनाचा आनंद घेण्यासाठी वाहन चालवितांना आपल्यासोबतच कुंटूंबांचा व इतर समाजाचा विचार करुन वाहतुकीच्या नियमांचा वापर करुन वाहन चालवावे. यासाठी वाहन चालवितांना मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, वाहनाच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावे, दूचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे डॉ. गिरीष ठाकरे म्हणाले.

कार्यक्रमा प्रसंगी अपघात विरहित वाहन चालवून कर्तव्य बजावलेल्या एस.टी. महामंडळाच्या वाहन चालकांचा, तसेच शिकाऊ दुचाकी परवाना चाचणीमध्ये जास्त गुण प्राप्त केलेल्या परवाना धारकांचा हेल्मेट देऊन सत्कार करण्यात आला. अभियानादरम्यान विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणा-या चित्रकला शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अभियानादरम्यान हेल्मेट रॅलीच्या उत्कृष्ठ आयोजनासाठी ड्रायविंग स्कुलच्या संचालकांचा व कलापथकाव्दारे रस्ता सुरक्षेची जनजागृती केल्याबद्दल कलापथकातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा मेढे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक राहुल ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोटारवाहन निरिक्षक अजय चौधरी, संदीप मुखे, साधना कवळे, प्रफुल्ल मेश्राम, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमर पखान, राहुल राठोड,आदित्य ढोक, अक्षय मालवे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कर्मचारी रामेश्वर इंगोले, श्यामसुंदर संगारे, सुनील शिरसाट, संदीप घोडे, सचिन घनमोडे, विद्याथी, कर्मचारी, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये