“थोड़ी चूड़ियां पहन लो” आंदोलनात महिला काँग्रेसकडून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध महिलांचा संताप उसळला आहे. 19 जून रोजी दुपारी महिला काँग्रेसकडून “थोड़ी चूड़ियां पहन लो” अशा घोषणांसह अनोखे आंदोलन करण्यात आले.
महिलांचा आरोप आहे की, जसे नवविवाहित स्त्री काही दिवस घरकाम करत नाही, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जे गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून कार्यरत आहेत, ते अजूनही “नवलाई”च्या मूडमध्ये असून शहराच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. या निष्क्रियतेविरुद्धच महिला काँग्रेसने आंदोलनाचा निर्णय घेतला.
या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. याआधी 16 जून रोजी महिला काँग्रेसकडून नगरपरिषद आणि पोलीस स्टेशनमध्ये निवेदनही देण्यात आले.
आंदोलनाला उपस्थित महिलांमध्ये प्रमुख अशा:
यास्मिन सैय्यद (महिला जिल्हा उपाध्यक्ष), पदमा त्रिवेणी (जिल्हा महासचिव), संगीता बोबडे (महिला शहर अध्यक्षा), मंगला बुरांडे आणि इतर अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
आंदोलनाचे प्रमुख मुद्दे:
मोकाट कुत्र्यांचा त्रास:
गेल्या तीन वर्षांपासून सतत निवेदने दिल्यानंतरही नगरपरिषदने मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे 3 वर्षांचे बालक आणि 65 वर्षीय महिला यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यांची नोंद आहे.
पाण्याची तीव्र टंचाई:
वर्धा नदी जवळ असूनही शहरात नियमित नळ पाणी येत नाही. नळाच्या वेळा अनिश्चित असून दोन-दोन दिवस नळच येत नाहीत. टँकरने निवडक भागांनाच पाणी दिलं जातं आणि महिलांकडून पैसे मागितले जातात.
नाल्यांची सफाई नाही:
अनेक भागांत नालेच नाहीत आणि जिथे आहेत, तिथे सफाई होत नाही. कचरा आठवडाभर पडून राहतो, त्यामुळे नागरिकांना रोगराईचा धोका आहे.
शास्त्री नगरमध्ये दुर्लक्ष:
रामनगर व इंदिरा नगरमध्ये कचरा गाडी जाते, पण शास्त्री नगरमध्ये जात नाही. तिथला वॉटर ए.टी.एम. अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
सडक व पथदिवे समस्या:
साई नगर, तेगिया नगर, लुंबिनी नगर यांसारख्या भागांमध्ये रस्ताच नाही. पावसाळ्यात परिस्थिती अतिशय बिकट होते. तसेच, अनेक भागांतील पथदिवे बंद असून अंधाराचे साम्राज्य आहे.
मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती व मनमानी:
सप्ताहात फक्त 5 दिवस कार्यालय सुरू असते. मुख्याधिकारी रंजनकर हे वेळेवर उपस्थित राहत नाहीत. नागरिकांना त्यांची प्रतीक्षा करावी लागते.
भेदभावपूर्ण कारवाई:
नगरपरिषदेने विरोधी पक्षांचे बॅनर तात्काळ काढले, पण सत्ताधारी पक्षाच्या बॅनर्सबाबत वेळकाढूपणा केला.
महिला काँग्रेसने स्पष्ट केले की, हा आंदोलन कोणत्याही पक्षविरोधात नसून, तो शहरातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे.