राज्याच्या उर्जामंत्र्यांमुळे चंद्रपुर जिल्ह्यासह राज्यात वीज संकट निर्माण होणार
कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरुच, एक संच पडले बंद
चांदा ब्लास्ट
महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी विविध न्यायिक मागण्यांसाठी कामबंद आंदोलन वीज केंद्र गेट समोर मंगळवार पासून सुरू केले आहे.याचा परिणाम थेट वीज केंद्रातील संच क्रमांक ९ वर पडला असून ८ क्रमांकाचा संच कधीही बंद होऊ शकतो त्यामुळं राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात वीज संकट निर्माण होऊ शकतो, परिणामी राज्याच्या उर्जामंत्र्यांमुळे जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांना भारनियमन सोसावे लागणार त्यामुळं उपमुख्यमंत्री,ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे राज्य अंधारणात जाणार असल्याची टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
वीज केंद्रातील कामगारांच्या वेतनात ३० टक्के वाढ करण्यात यावी, सर्व कामगारांना ६० वर्षापर्यंत रोजगार देण्यात यावा, त्यांना सुरक्षा देण्यात यावी, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन देण्यात यावे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे,भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, कर्तव्य बजावत असताना कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला १५ लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी.
सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना कामावर घेण्यात यावे, यासह इतर मागण्यांना घेऊन वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी हे कामबंद आंदोलन पुकारले आहे.मात्र आज गुरुवारी सुद्धा कामबंद आंदोलन सुरूच असून संच क्रमांक ८ पूर्णपणे बंद पडले तर संच क्रमांक ९ कधीही बंद होऊ शकतो. याची जबाबदारी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी व चंद्रपूर जिल्ह्यात वीज संकट व लोडशेडिंग निर्माण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.