जिवती तालुक्यातील मौल्यवान गारगोटीची चक्क परराज्यात तस्करी
तस्करांची महसूल व वनविभागाशी हातमिळवणीची चर्चा ; दलालांचे जिवती टू परराज्यात कनेक्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- नैसर्गीक संपत्तीचा वारसा लाभलेल्या जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील माळरान व वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या भागातून लाखो रूपये किमतीच्या मौल्यवान दगडांची ( गारगोटी ) ची खुलेआम तस्करी सुरू असून बिनदिक्कतपणे होत असलेल्या या तस्करीवर वनविभागासह महसूल प्रशासनानेही संशयास्पदरित्या चुप्पी साधल्याने मौल्यवान दगडांच्या तस्करीला दोन्ही विभागांची मुकसंमती असल्याची प्रचिती येत आहे.तालुक्यातील चोपणगुडा,पुनागुडा,नाईकनगर, गणेरी, भाईपठार, कावडगोंदी याबरोबरच संपुर्ण जिवती तालुक्याला नैसर्गीक संपत्तीचा अमुल्य वारसा लाभलेला आहे. यात वनजमिनी तसेच माळरानात नैसर्गीकरित्या असलेले अमुल्य दगड अस्तित्वात असून या दगडांची (गारगोट्यांची) बाजारात मोठी किंमत मिळत असल्याचे सांगण्यात येते.
हिच बाब हेरून गडचांदूर येथील काही बड्या आसामींच्या माध्यमातून या गारगोटीची परराज्यात तस्करी केली जात आहे. संपुर्ण तालुक्यात दलाल आपल्या मजुरांच्या साहाय्याने ही गारगोटी जमा करून हजारो क्विंटल मौल्यवान दगडांची (गारगोटी ) ची तस्करी मागील अनेक महिण्यांपासून सुरू असून याकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभाग मात्र संशयाच्या भोव-यात असल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येत आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक ठिकाणांहून साठवलेली गारगोटी कुठे व किती प्रमाणात याची तंतोतंत माहिती वन विभाग व महसूल विभागातील काहींना व असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे तर दोन्ही विभागातील कर्मचारी व अधिका-यांच्या नाकावर टिच्चून मागील अनेक महिण्यापासून तब्बल हजारो टन गारगोटी भरलेली अनेक वाहने बिनदिक्कतपणे इच्छितस्थळी जात आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष का करीत आहे.याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नसून तस्कर व संबंधित विभागाच्या अर्थपुर्ण संबंधातून संपुर्ण तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मौल्यवान दगडांची परराज्यात व इतर ठिकाणी बिनदिक्कतपणे तस्करी करून तस्कर व अधिकारी आपले ‘उखळ पांढरे’ करून घेत असल्याची ओरड जनतेतून होत
आहे.या प्रकाराकडे वरीष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असून वनविभाग व महसूल विभागाने संयुक्त पथके नेमून तालुक्यातील वनजमीनी, माळरान, तसेच त्या लगत असलेल्या नदीनाल्यांच्या परिसरातची प्रत्यक्ष पाहणी केल्यास साठवलेल्या हजारो क्विंटल गारगोटीचे साठे आढळून येतील,त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमीनी व्यक्त केले आहे.