वाहन चालक उपविभागीय कार्यालयावर धडकले
अधिकाऱ्यांना सादर केले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करीत वाहन चालकांच्या हातून अपघात झाल्यास दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली आहे. हा कायदा त्वरित रद्द करावी अशी मागणी करीत भद्रावती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या नेतृत्वात तालुक्यातील वाहन चालकांनी उपविभागीय कार्यालयावर धडक देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. कायदा रद्द न केल्यास वाहन चालक संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी वाहन चालकांकडून केंद्र शासनाच्या या नव्या कायद्याचा निषेध करण्यात आला. आधीच वाहन चालवीत असताना वाहन चालकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. चालकाच्या वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते. तसेच चालक हा आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याने तो दहा लाख रुपये दंड भरू शकत नाही. त्याला दहा वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा नवा कायदा रद्द करण्याची मागणी वाहन चालकांकडून निवेदनाच्या सहाय्याने करण्यात आली आहे.
या नव्या कायद्याचा वाहचालकांच्या संघटनेने निषेध व्यक्त केला असून या संघटना कायद्याच्या विरोधात उग्र झाल्या आहेत.सदर मोर्चात तालुक्यातील वाहनचालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.