नव्या वर्षात बळीराजांना सालदारांची चिंता!
सालदारांचे भाव गगनाला भिडले : दिवसेंदिवस शेतमजुरांची संख्या होत आहे कमी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होत आहे. गुढीपाडवा बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण याच दिवसापासून बळीराजाच्या शेतीच्या सुरुवातीचा प्रारंभ होत असतो, मात्र दिवसेंदिवस शेतमजुरांची संख्या कमी होत चालल्याने सालदारांचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेत वातावरण पसरलेले असून सालदार मिळणार की नाही ?ही विवंचना बळीराजासमोर आहे.
वाढता उत्पादन खर्च व शेतमालाला अत्यल्प भाव यामुळे बळीराजाच्या शेती व्यवसायाचे गणित आधीच कोलमडलेले आहे .त्यात दिवसेंदिवस कमी होणारी मजुरांची संख्या शेती व्यवसायासाठी कायम चिंतेचा विषय ठरली आहे. अशा अवस्थेत शेती व्यवसाय कसा करावा, तो करावा की नाही या विवंचनेत बळीराजा सापडलेला आहे .सध्या एक ते दीड लाख वार्षिक असा सालदाराचा भाव आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सालदार ठेवणे आता अशक्यप्राय झाले आहे.
शेतीतील संपूर्ण उत्पन्न सालदारांनाच द्यायचे मग आपण खायचे काय? हा प्रश्न बळीराजा समोर पडलेला आहे .सध्या बळीराजासमोर सर्वात मोठा प्रश्न शेतमजुराचा पडलेला आहे .शेतमजुरा शिवाय शेती करणे अशक्यप्राय आहे मात्र या शेतमजुरांचे दर ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणात शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी कायम नुकसानीत आलेला आहे. वाढता उत्पादन खर्च, निसर्गाचा प्रकोप आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेवटपर्यंत पीक आपल्या हातात येईल की नाही ?याविषयीची शाश्वती नसते .शासनाकडून सुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या जातात मात्र प्रत्यक्ष वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रश्न निर्माण होतात .
यावर्षी गुढीपाडव्यापासून बळीराजाच्या शेती व्यवसायाची नव्या जोमाने सुरुवात होत आहे. येणारे नवे वर्ष तरी बळीराजासाठी सुखाचे व समाधानाचे जावो हीच सदिच्छा!
दिवसेंदिवस उत्पादन खर्चात वाढ आणि शेतमालाला अत्यल्प भाव यामुळे शेती व्यवसाय संकटात आलेला आहे. त्यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चावर 40 टक्के लाभ असा शेतमालाला भाव मिळाल्यास शेती व्यवसाय तग धरू शकतो.
भोजराज डाखरे, रा. पिपरी देशमुख
शासनाच्या विविध मोफत योजनेमुळे शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे यांत्रिक शेती करणे हे महागडे काम आहे अशा अवस्थेत सामान्य शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न बळीराजासमोर आहे.
किशोर पाचभाई, रा. विजासन,भद्रावती