ताज्या घडामोडी

वनमंत्र्यांच्या मतदारसंघातच सरण रचण्यासाठी लाकडे नाहीत – प्रेताला द्यावी लागतेय अग्नी ऐवजी माती

हिंदुंच्या धार्मिक अस्थेला बसतोय धक्का - मृत्यूनंतरच्या फरफटीमुळे नागरिकांत असंतोष

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

वनसंपदेने समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्याचे वनमंत्री पद आहे. वनमंत्री असलेल्या सुधिर मुनगंटीवार ह्यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूर तालुक्यात वन विभागाच्या तीन डेपोत मागणी करूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे न मिळाल्याने अखेरीस मृतदेहाला माती द्यावी लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रत्येकाच्या जीवनात धार्मिक आस्थेला अनन्यसाधारण महत्त्व असते त्यातल्यात्यात निदान मृत्यूपश्चात आपल्या धार्मिक आस्थेचे व परंपरांचे काटेकोर पालन व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीय तसेच संबंधितांच्या संवेदना तीव्र असतात. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार मनुष्याच्या जीवनात 16 संस्कार केले जातात त्यानुसार सर्वाधिक संवेदनशील संस्कार असतो मृत्यूपश्चात देहावर होणारा अग्निसंस्कार. हा संस्कार धार्मिक मान्यतेनुसार अंतिम संस्कार करण्यात आला नाही तर  मयत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही इथपासून अनेक मान्यता व भावना निगडित असतात

वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या मतदार संघात असलेले व ज्या गावाला तालुका घोषित करण्याचा त्यांचा मानस आहे अशा कोठारी पोलीस ठाण्याजवळ वास्तव्यास असलेले नाभिक समाजाचे वासुदेव पंदीलवार (76) हे तिन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन पावले. अर्थातच सनातन धर्मीय असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना दाह संस्कार करण्यासाठी लाकडांची आवश्यकता होती. त्यासाठी निकटवर्तीयांनी कोठारी, कान्हळगाव तसेच झरण येथिल वन भांडारात (Forest Depot) सरण रचण्यासाठी लाकडांची मागणी केली मात्र तीनही ठिकाणी जळावू लाकुड उपलब्ध नसल्याचे सांगून दुःखाच्या स्थितीत असलेल्या लोकांची बोळवण केली.

सनातन धर्माची अस्था बाळगुन जिवन व्यतीत करणाऱ्या पंदीलवार कुटुंबीयांना अखेरीस काळजावर दगड ठेऊन वासुदेव पंदीलवार ह्यांच्या मृतदेहाला खड्डा खोदून माती द्यावी लागल्याची दुर्दैवी घटना घडली. ह्याबाबत त्यांच्या 65 वर्षीय पत्नी शशिकला पंदीलवार ह्यांनी रोष व्यक्त केला असुन मृत्यनंतरही पतीच्या पर्थिवाची झालेली ससेहोलपट असह्य असल्याची भावना व्यक्त केली.

प्रभु श्रीराम मंदिराच्या उभारणीत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दरवाजे असो वा गर्भगृहाचे कपाट असो त्यासाठी लागणाऱ्या दर्जेदार सागवानी लाकडांचा पुरवठा व भारताची शान असलेल्या लोकशाहीच्या मंदिरात म्हणजेच नव्या संसद भवनात वापरलेले संपूर्ण लाकुड पुरविणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील वनांच्या परिसरात राहणाऱ्या व वन मंत्र्यांच्या मतदारांनाच अंत्यविधीसाठी जळावू लाकुड मिळू नये ह्यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय? ह्याकडे वन मंत्र्यांनी संवेदनशीलपणे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

मुख्य वन संरक्षक श्वेता बोड्डू ह्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्याठिकाणी लाकुड उपलब्ध नसल्याचे मान्य केले व लवकरच त्याठिकाणी लाकडे उपलब्ध होतील असे सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तींनी वन रक्षकास मागणी केली असती तर इतर ठिकाणाहून व्यवस्था केली असती असेही सांगितले मात्र ती व्यवस्था होईपर्यंत पार्थिव अंत्यसंस्काराशिवाय कितीवेळ तसाच पडुन राहिला असता ह्याचाही विचार करणे गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये