ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श ग्राम निर्मिती चळवळ लोक चळवळ होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने पुढाकार घ्यावा 

वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    “गाव करी ते राव न करी”, “तुझं गावच नाहीका तीर्थ तू उगीच कशाला फिरतो” या उक्तीनुसार आपले गाव आपली ओळख व अस्मिता मानून गावातील प्रत्येकाच्या सुख,शांती,आनंद,समाधान,आरोग्य स्वावलंबन व अपेक्षित उन्नतीसाठी अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी,पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार,पेरे पाटील यांच्या पाटोदा च्या धर्तीवर ग्राम उंबरखेड आदर्श गाव निर्माण करूया.यासाठी जात धर्म पंथ पक्ष संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सेवा योजना तथा गावातील सर्वांनी आपापले निरपेक्ष योगदान द्यावे असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.

     देऊळगाव राजा येथील समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन उंबरखेड येथे दिनांक 22 ते 28 जानेवारी करण्यात आले होते.या शिबिराच्या समारोपीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून वनश्री मेहेत्रे उपस्थित होते.

    कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सदानंद डोईफोडे,मा. सुजित गुंडे,मा.गजानन कायंदे,मा.रामदास मांटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश जाधव,मा. विकास काकड,मा. भीमराव कंकाळ,राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांच्या हस्ते झाले.

    या प्रसंगी वनश्री मेहेत्रे यांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण व संस्कृती संवर्धन,जलसंधारण व्यसनमुक्ती आदी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करून युवकांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षकांच्या मार्गदर्शनात धेय्य साध्य करण्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते श्री सुजित गुंडे यांनी सायबर क्राईम पासून स्वतःचा बचाव कसा करायचा याच्या मार्मिक टीप्स देऊन ऑनलाईन व्यवहारात सावधानता बाळगण्याचे सांगितले.तर मुख्याध्यापक श्री.रामदास मांटे यांनी उंबरखेड गाव आदर्श करण्यासाठी आपण सर्वजण एक संघपणे कार्य करू असे अभिवचन दिले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी हर्षल नागे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भागवत गायके यांनी मानले.कार्यक्रमास एन.एस.एस.शिबिरार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये