1 सप्टेंबर पासुन रुग्णवाहिकांना बेमुदत लागणार ब्रेक – गंभीर रुग्णांचे होणार हाल
108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय कमी मोबदला मिळत असल्याने समान काम समान दाम तत्त्वावर मोबदला देण्याच्या मागणीसाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघात व इतर संकटसमयी रुग्णसेवेसाठी 108 क्रमांक डायल केल्यास तत्परतेने धावून येणाऱ्या रुग्णवाहिकेवर बीव्हीजी कंपनीकडून खासगी चालक नियुक्त केलेले आहेत. त्यांना बारा तास कामासाठी 15 ते 19 हजार रुपये मोबदला दरमहा मिळतो मात्र कर्नाटक, तमिळनाडू राज्यात 8 तासासाठी 30 हजार आणि 12 तास कामासाठी 38 हजार मिळतात. या तफावतीबाबत राज्यातील सर्व रुग्णवाहिका चालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली. समान काम समान दाम देण्याची त्यांची मागणी होती.
याबाबत मंत्र्यांनी बीव्हीजी कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. वास्तविक बघता त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन महिना लोटूनही बीव्हीजी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय घेतला नाही नसल्याने अखेरीस नाईलाजाने राज्यातील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या गैरसोईस बीव्हीजी कंपनी आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनीही काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असुन त्यासंदर्भातील निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले ह्यावेळी महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहनचालक संघटनेचे मुख्य प्रवक्ते खुशाल लकड़े, उमेश येनावार, हरिशकुमार नवले, अमित धोत्रे तसेच नंदु मगरे इत्यादी पायलट उपस्थित होते.
रुग्णवाहिका चालकास कमी मोबदल्यात काम करावे लागत असल्याने राज्य सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत खास निर्णय घ्यावा अशी आमची मागणी असून निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा 1 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन आणि बेमुदत उपोषणही करण्यात येईल.
तेजस कराळे,
अध्यक्ष, 108 रुग्णवाहिका चालक संघटना
महाराष्ट्र राज्य