रायपूर शिवारात वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
बोर व्याघ्र प्रकल्पातील गावांचे तातडीने पुनर्वसन करण्याचीशासनाकडे ग्रामस्थांची मागणी..
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रायपूर (जंगली)शिवारात आज सायंकाळी 4 वाजता दिवसाढवळ्या वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. भगवाणजी धुर्वे, रा. रायपूर जंगली, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना पांदण रस्त्यावर वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्या चढवीला असता त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती आहे.
या परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापूर्वी आमगाव जंगली येथील शेतकरी खोब्रागडे यांच्यावर त्यांच्या शेतात वाघाने जागीच ठार केले होते. तसेच जुलै-ऑगस्ट महिन्यात अस्वलीने एका गुराख्यावर हल्ला केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बोर व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित पुनर्वसित गावांचे स्थलांतर व पुनर्वसन वेळेत झाले असते, तर वन्यप्राण्यांना वावरण्यासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध झाले असते आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी झाल्या असत्या, अशी भावना परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या गरमसूर मुख्य गाभा क्षेत्रातील कोर झोनमधील गावांच्या पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने मागील महिन्यात निवेदना द्वारे मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.या बाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन संबंधित गावांचे तातडीने पुनर्वसन व स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, अद्यापही या प्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आज पुन्हा एकदा शेतकऱ्याचा बळी गेल्याने प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि बोर व्याघ्र प्रकल्पातील मुख्य गाभा क्षेत्रातील गावांचे विनाविलंब पुनर्वसन व स्थलांतर करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.आणी वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबास तातडीने 25लाख शासन मान्यता नुसार सानुग्रह मदत तातडीने देण्यात यावे व शेतकरी कुटुंबातील वेक्तीला नोकरी देण्यात यावी असा जोर धरत आहे…


