बोरगाव हेलोडी येथील स्मशानभूमीसाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू तालुक्यातील मौजा बोरगाव येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे निवेदन सादर करून स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, बोरगाव येथील शासनाच्या निधीतून सुमारे तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमीचे काम करण्यात आले आहे. मात्र, स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी अद्याप योग्य रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना अंत्यविधीसाठी मृतदेह नेताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या नाल्याच्या बाजूने अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात येतात. मात्र, नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची हद्द नाल्यापर्यंत केल्याने हा मार्गही अडथळ्यांचा झाला आहे. त्यामुळे गावातील नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह स्मशानभूमीत नेणे कठीण झाले आहे.
पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, मृतदेह नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. शासनाने पाहणी करून गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आकाश कुंभरे उमेश श्रीरामजी मनोहर धुर्वे मनोहर पंधरे प्रभाकर उईके प्रदीप कुरसंगे किशोर पंधराम संजय पंधरे प्रभाकर उईके ज्योती पंधरे सविता आत्राम वैशाली कुरसंगे रुक्मा पंधरे सविता धुर्वे दुर्गा पंधरे व ग्रामस्थांनी केली आहे.
रस्ता उपलब्ध न झाल्यास अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना होणारा त्रास कायम राहणार असल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



