अभिषेक माध्यमिक विद्यालयात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली (खु.) येथे शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनी कु. राजनंदनी वाळके, कु. गंगा पिटलेवाळ व प्रिया भोईनवाळ यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कु. पायल कांबळे, ओजल गायकवाड, अंजली कांबळे व कु. कोमल देवकते यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरणात देशप्रेमाची भावना जागृत केली.
यावेळी कु. मेगा, अमोल रेनेवाड, अर्जुन तोगरे व कु. सुवर्णा सुरणर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक अंगद गायकवाड होते, तर ध्वजारोहण अध्यक्ष म्हणून दत्ता पाटील बोळगिर उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून सुभाष राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलकार्जुन पा. सुरणर,अशोक चव्हाण, देविदास राठोड,शेषेराव पाटील बोळगिरी, फारूख शेख, शिवराम तसेच सूर्यभानजी केदासे यांची उपस्थिती होती.
८० व्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना मुख्याध्यापक अंगद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि जबाबदारी याबाबत अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत व ‘लाँग मार्च’चे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. बी. पट्टेवाले यांनी केले. सूत्रसंचालन एस. एल. गेडाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए. के. लदाफ (शेख) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए. पी. गेडाम सर, जे. बोळगिर सर, बी. बी. मुर्कीकर, एफ. एम. पठाण व टी. आर. वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



