ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
यवतमाळ-माहूर-किनवट नव्या रेल्वे लाईन्सला तातडीने मंजुरी द्या
खासदार प्रतिभा धानोरकर यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट
यवतमाळ :- विदर्भ आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या प्रदेशांना थेट जोडणाऱ्या तसेच यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, धार्मिक आणि शेतीप्रधान भागाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक ठरणाऱ्या यवतमाळ-आर्णी-हिवरा-माहूर-किनवट या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आगामी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.
या प्रसंगी सादर केलेल्या निवेदनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, यवतमाळ, आर्णी, हिवरा, माहूर आणि किनवट परिसरातील लाखो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे सेवेपासून पूर्णपणे वंचित आहेत. योग्य रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपला कृषी माल मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेळेत पोहोचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. हा रेल्वे मार्ग साकार झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनांना सुलभ बाजारपेठ उपलब्ध होईल आणि वाहतूक खर्च कमी होऊन बळिराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळेल. याशिवाय, या प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामीण तरुणांसाठी उच्च शिक्षण, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन संपूर्ण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती प्राप्त होईल.
विशेष म्हणजे, माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री रेणुका देवीचे पवित्र स्थान आणि भगवान श्री दत्तात्रेयांचे प्रसिद्ध धाम असल्याने दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या नव्या रेल्वे लाईनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होईल, ज्यामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल. या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करून रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचे तांत्रिक सर्वेक्षण, मंजुरी व प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करून आगामी रेल्वे अर्थसंकल्प व विकास योजनांमध्ये या प्रकल्पाचा अंतर्भाव करावा, अशी आग्रही विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.



