ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ते गावांना जोडतात; पण शिक्षण माणसाला ध्येय प्राप्तीशी जोडतात – आ. सुधीर मुनगंटीवार

आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते आंबेधानोरा येथील नूतन आदर्श शाळा इमारतीचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

आ.मुनगंटीवार यांचा शिक्षणातून संस्कार, कर्तृत्व आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता; शिक्षण, आरोग्य व विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य

चंद्रपूर :_ पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नूतन आदर्श शाळा इमारतीचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी “रस्ते गावांना जोडतात; पण शिक्षण माणसाला ध्येयापर्यंत पोहोचवते,” असे प्रतिपादन करत त्यांनी शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले. ही नवी शाळा केवळ विटा-सिमेंटची इमारत नसून ज्ञान, संस्कार, स्वप्ने आणि कर्तृत्व घडविणारे पवित्र ज्ञानमंदिर असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या, जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर गाव, जिल्हा व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या लोकार्पण कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,भाजपा तालुका अध्यक्ष (भाजपा) हरीश ढवस, राहुल संतोषवार,पोंभुर्णा नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे,उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार,विनोद देशमुख,ज्योतीताई बुरांडे,आंबेधानोरा सरपंच निरंजनाताई मडावी,माजी सरपंच सिताराम मडावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश जुमनाके,गुरुदास पिपरे,गटविकास अधिकारी नमिता बांगर,कार्यकारी अभियंता बांधकाम प्रदीप बाराहाते उपअभियंता (बांधकाम) सुनील मेश्राम,गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी,

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तुकडोजी आलाम यासोबत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार म्हणाले, या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन उज्ज्वल व्हावे, त्यांची स्वप्ने साकार व्हावीत आणि त्यांनी आपल्या ज्ञान, संस्कार व कर्तृत्वाच्या बळावर समाजात आदर्श निर्माण करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून आई-वडिलांना सर्वात मोठी भेट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीदेखील आपल्या गुणवत्तेच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणत्याही कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांइतकेच नव्हे, तर त्याहून अधिक यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांचे यश हे शाळेच्या नावावर नव्हे, तर त्यांच्या कष्ट, जिद्द आणि गुणवत्तेवर अवलंबून असते, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, जीवनातील पहिली आणि सर्वोत्तम गुरु म्हणजे आई आहे. तिच्या संस्कारांतूनच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या नावाने विद्यापीठांना नामकरण व्हावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. ही नावे केवळ व्यक्तींची नसून समाजाला दिशा देणारी प्रेरणास्थाने आहेत. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा उल्लेख केला. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा आणि मला काय करायचं या वृत्तीऐवजी “मी समाजासाठी काय करू शकतो” हा विचार प्रत्येकाने अंगीकारावा, असे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले.

यापूर्वी आंबेधानोरा गावाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी गावाकडे जाणाऱ्या खराब रस्त्याची समस्या माझ्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यानंतर रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करण्यात आली. परिणामी, आज ग्रामस्थांना सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनतेने मांडलेल्या प्रत्येक रास्त मागणीची संवेदनशीलतेने दखल घेऊन ती मार्गी लावणे हेच आपले कर्तव्य असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघाच्या विकासाबाबत बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, जनतेने दिलेल्या विश्वासामुळे विधानसभेत शेवटच्या घटकाच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करता आला . शेतकऱ्यांना धान बोनस मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक शाळांचा विकास करण्यात आला असून ज्यूबली शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. तसेच पोंभुर्णा, बल्लारपूर, मुल आणि चंद्रपूर येथे आधुनिक वाचनालयांची उभारणी, उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती यासोबत असंख्य विकासकामे बल्लारपूर विधानसभेत पूर्ण झाली आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा अखंड सुरू राहणारा प्रवास असून, शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाची गती अधिक वेगवान करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये