आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डिझेलसाठी दररोज ३० लिटर राखीव कोट्याला मंजुरी
आ. मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश

चांदा ब्लास्ट
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आधार; काळाबाजार रोखत थेट शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
चंद्रपूर :_ खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा सामना करावा लागू नये, शेतीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राखीव डिझेल कोटा निश्चित करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष प्रशासनापर्यंत पोहोचवत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आ. मुनगंटीवार यांनी घेतली होती. त्यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना शेतकऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे दररोज ३० लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश जारी केले आहेत.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकऱ्यांना नांगरणी, पेरणी, मशागत आणि इतर शेतीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता भासत आहे. अनेक ठिकाणी डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होणे, साठेबाजी किंवा अधिक दराने विक्री होण्याच्या तक्रारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेत आ. मुनगंटीवार यांनी तातडीने हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र, सातबारा, फार्मर आयडी, वाहनाचा आरसी बुक अथवा आवश्यक कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यांना दररोज ३० लिटरपर्यंत डिझेल देण्यात येणार आहे. तसेच पेट्रोल पंपांवर उपलब्ध साठा, दररोज होणारी विक्री आणि प्राप्त होणारा नवीन साठा याची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. काळाबाजार, साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमित तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत प्रशासनाला संवेदनशील निर्णय घेण्यास भाग पाडणारे नेतृत्व म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिले जाते. “शेतकरी अडचणीत असताना शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा,” ही भूमिका त्यांनी नेहमीच जपली आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातून समाधान व्यक्त होत आहे.



