सण – उत्सव शांततेत साजरे करू या!
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन ; जिल्हा शांतता समितीची बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.
नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पेालिस विभागाच्या वतीने आयेाजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, सहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, शहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सोशल मिडीयावर फेक किंवा निगेटिव्ह मॅसेज दिसला की त्वरीत पोलिस विभाग किंवा सायबर टीमला कळवावे. वेळेवर फॅक्ट चेक करावे, जेणेकरून अफवा पसरणार नाही. विशेष म्हणजे पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मनपा आयुक्त अकुनूरी नरेश म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित रहावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध् करून दिले जाईल. साफसफाई व इतर आवश्यक उपाययेाजना मनपाने केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.
पोलिस प्रशासन सजग – पोलिस अधिक्षक नोपाणी
ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोमांसची तस्करी होऊ नये, यासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील अफवांवर किंवा चुकीच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबरची टीम 24 बाय 7 कार्यरत आहे. काही चुकीचे आढळल्यास पोलिस विभाग किंवा 112 क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावी. जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.
नागरिकांनी केल्या सुचना : ईद निमित्त शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी प्रशासनाला सुचना केल्या. यात 1) विद्युत पुरवठा अखंडीत राहावा 2) पाणी पुरवठा नियमित व्हावा 3) कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा 4) गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवावे 5) असामाजिक तत्व व विघातक लोकांना गर्दीपासून दूर ठेवावे 6) सोशल मिडीयावर अफवा पसरू नये, यासाठी गांभियाने दक्षता घ्यावी 7) शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे 8) अवैध होर्डीग्जवर कारवाई करावी.



