वर्धा जिल्ह्यात अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांची जनजागृती मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती उपक्रम राबविले जाणार असून, पालकांमध्येही हेल्मेट वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
तसेच “डोकं फोडू नका, हेल्मेट वापरा” अशा संदेशांचे पोस्टर शहरातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे समुपदेशन करण्यावरही भर दिला जाणार आहे.
वाहतूक शाखेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमांबाबत माहितीपर व्हिडिओ आणि संदेश प्रसारित केले जाणार आहेत. अपघातप्रवण ठिकाणी विशेष सुरक्षा स्टिकर्स लावण्यास सुरुवात करण्यात आली असून, हेल्मेट वापराबाबत “हेल्मेट वाटप” उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
याशिवाय, रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, नागरिकांनी सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.



