सुरजागड, कोणसरीतील ट्रकांचा विठ्ठलवाडा–तारसा खुर्द रस्त्यावर अतिक्रमणाचा कहर
दुचाकीधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
विठ्ठलवाडा ते तारसा खुर्द या प्रमुख मार्गावर सुरजागड प्रकल्पाशी संबंधित ट्रकचालकांनी रस्त्याच्या एकाच बाजूंनी अनाधिकृतरित्या वाहनांच्या दोन रांगा लावल्याने आज परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे शुक्रवार हा बाजाराचा दिवस असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. मात्र ट्रकांच्या दुहेरी रांगांमुळे रस्ताच अक्षरशः अरुंद बनला असून दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “रस्ता आहे की ट्रक पार्किंग?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका यांना देखील मार्ग काढणे कठीण झाले असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासन व वाहतूक विभागाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, संबंधित ट्रकचालक व कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, याचीही खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी परिसरातील जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.



