हंसराज अहीर यांची उच्चस्तरीय समितीवर निवड
महात्मा जोतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती स्मरणोत्सवासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_:स्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची सन 2027 हे वर्ष 200 वी जयंती वर्ष आहे. केंद्र सरकारने या 200 व्या जयंतीनिमित्त देशव्यापी स्मरणोत्सव सुरु केलेला आहे. हा दोन वर्षाचा उत्सव 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2028 या कालावधीत साजरा केला जाणार आहे.
म. फुले यांच्या 200 व्या जयंती निमित्त देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भांत, भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर या स्मरणोत्सवाचे मार्गदर्शन व देखरेख करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सर्व राज्यातील प्रतिनिधींचा समावेश केला गेला आहे.
या उच्चस्तरीय समितीवर पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ओबीसी संघटना, माळी समाज संघटना यांनी हंसराज अहीर यांचे अभिनंदन केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीचे हे स्मरण केवळ भारतातील महान समाजसुधारकांपैकी एकाला श्रध्दांजली नसून, सामाजिक न्याय, समता आणि सशक्तीकरण या त्यांच्या चिरंतर विचारांना पुन्हा अधोरेखित करण्याची संधी आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी ही समिती महत्वाची भुमिका बजावणार आहे. फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा देशभर प्रसार करण्यासाठी पूर्ण क्षमतेने योगदान देईल व केंद्र सरकारने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपुर्वक आभार व्यक्त करतो असे हंसराज अहीर म्हणाले.



