‘मन की बात’ केवळ संवाद कार्यक्रम नाही, विकासाचा राजमार्ग – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’मधील विषयांवर स्थानिक पातळीवर काम करण्याचे आ.मुनगंटीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

चांदा ब्लास्ट
‘मन की बात’ स्मृतिचिन्ह देऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
आ. मुनगंटीवार यांच्याकडून ज्येष्ठांना काठीचे वितरण
चंद्रपूर :_ देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमातून देशातील नाविन्यपूर्ण, प्रेरणादायी आणि जनहिताच्या कामांना नवी दिशा मिळते. त्या विचारांना स्थानिक पातळीवर कृतीत उतरवणे हीच खरी जनसेवा असून ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून देशाच्या विकासाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विसापूर, ता. बल्लारपूर येथील पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती, रोजगार, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ‘मन की बात’मधील संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी विसापूर येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “मन की बात” हे स्मृतिचिन्ह भेट देत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.या कार्यक्रमाला पिंटू देऊळकर, किशोर पदींलवार, गणेश टोंगे, संदीप पोडे, गजानन पाटणकर, विलास भोयर, किशोर चोपडे, संजय सिडाम, भारत जीवने, वैभव भोले, विजय इटणकर, विद्याताई देवाळकर, सुरेखाताई ईटणकर, अंजलीताई पदींलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जगातील असे एकमेव प्रधानमंत्री आहेत जे जनतेशी थेट संवाद साधतात. ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यांवर प्रकाश टाकला जातो. भारताच्या अभिमान, स्वाभिमान आणि प्रगतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याचे काम ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमातून मिळते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, स्मार्ट आयटीआय, मुल येथील पॉलीटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय, अजयपूर येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच अत्याधुनिक सैनिक शाळा अशा अनेक विकासकामांद्वारे ‘मन की बात’मधील विचारांना मूर्त स्वरूप देण्यात आले आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वनमंत्री म्हणून कार्य करत असताना फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशातील हरित क्षेत्रात २५५० ग्रीन कव्हर वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करता आले. तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नामांकन मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करता आला, याचा विशेष आनंद आहे. यासोबतच भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठीही पुढाकार घेता आला. ‘मन की बात’ कार्यक्रमातून मिळालेल्या प्रेरणेमुळेच ही कामे अधिक प्रभावीपणे करता आली, असेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
विसापूरच्या विकासाबाबत बोलताना आ.मुनगंटीवार यांनी सांगितले, १९९५ च्या विसापूर आणि आजच्या विसापूरमध्ये मोठा बदल झाला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म, अंतर्गत सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची योजना, विविध समाजांसाठी सामाजिक सभागृह तसेच महिला बचत गटांच्या प्रभाग संघासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विसापूर अधिक प्रगत व्हावे, शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा आणि ‘हम साथ-साथ हैं’ हा भाव कायम राहावा, हा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले.
‘मन की बात’ भव्य कार्यक्रम होणार चांदा क्लब मैदानावर
सन २०१४ मध्ये सुरू झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रम एक भव्य स्वरूपात चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
सेवाभावाचा सुंदर उपक्रम : ज्येष्ठांना काठीचे वितरण
विसापूर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात आधार मिळावा या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून काठी वितरणाचा सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील ज्येष्ठांचा सन्मान राखणे, त्यांच्या गरजांकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि त्यांच्या आयुष्यात आधार निर्माण करणे हीच खरी जनसेवा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



