ताज्या घडामोडी

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे उद्घाटन तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे केले लोकार्पण

वर्धा, दि.15 (जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती दिदी योजना, गरीबांसाठी घरकुल यासारख्या योजना राबवून प्रत्येक नागरिक महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

सिध्दीविनायक गणपती मंदिर, केळझर येथे पशुचिकित्सालयाचे भूमीपूजन, सेलडोह येथील पशुचिकित्सालयाचे लोकार्पण, ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्राचे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध लाभाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, माजी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार शंकुतला पाराजे आदी उपस्थित होते.

गरीबांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न असून प्रत्येकाला रोजगार देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शासन राबवित असलेल्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून लाभ देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विधानसभेत सुध्दा महिलांना आरक्षण देण्याचे नियोजन केले आहे. कलीयुगामध्ये दिशा देण्याचे कार्य महिला शक्ती करीत आहे, असेही त्या पुढे बोलतांना म्हणाल्या.

हजारो नागरिकांना महाराजस्व अभियानाचा लाभ – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त सर्व प्रथम वर्धा जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. हीच संकल्पना घेऊन राज्यात सेवा पंधरवाडा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आता महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून प्रत्येक नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविण्यासोबतच विविध योजनेचे लाभ देण्यात येत आहे. या अभियानामुळे हजारो नागरिकांना लाभ होत आहे. या लाभ वितरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी यांनी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महसूल विभागाच्यावतीने संजय गांधी येाजनेच्या लाभार्थ्याना अर्थसहाय्य, जात प्रमाणपत्र, विविध दाखले, कृषि विभागाच्यावतीने लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण, मुलींना सायकल वितरण, दिव्यांगांना लाभाचे वितरण यासहा विविध योजनेचे लाभ व प्रमाणपत्र तसेच दाखले वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार शंकुतला पाराजे यांनी केले. केळझर व सेलू येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये