
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. १५) प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. आयोगाच्या या आदेशामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची औपचारिक तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करताना स्पष्ट केले की, या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच मतदार यादीचे संगणक प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजन करून ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या तयार करण्यात येतील.
यापूर्वी ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही ठिकाणच्या त्रुटी किंवा अनवधानाने वगळल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडतही घेण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात विलंब झाल्याने, अशा ग्रामपंचायतींसाठी २४ जुलैपर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
*असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम*
अधिसूचनेनंतर आता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे:
_२४ जुलै : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
_२४ ते २९ जुलै : नागरिकांना यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाईल.
_४ ऑगस्ट : प्राप्त हरकतींची नियमानुसार छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.



