ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि गांभिर्याने करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत    

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. 15 वर्षांनंतर जनगणना होत असून ही संपूर्ण प्रक्रिया डिजीटल पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचा-यांनी अचूक, पारदर्शकपणे आणि गांभिर्याने जनगणनेचे काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नुतन सावंत, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम (चंद्रपूर), संदीप भस्के (वरोरा), अजय चरडे (मुल), पर्वणी पाटील (ब्रम्हपुरी), अर्जुन पावरा (बल्लारपूर), किशोर घाटगे (चिमूर) यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठराविक वेळेत जनगणनेचे काम करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जास्तीत जास्त शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करावी. अधिकारी – कर्मचा-यांनी जनगणनेबाबत असलेले प्रशिक्षण गांभिर्याने करावे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे या कामाचा विभागीय तसेच शासन स्तरावर नियमित पाठपुरावा होणार आहे. सर्व उपविभागीय अधिका-यांनी आपल्या अधिपत्याखालील तहसीलदार व संपूर्ण यंत्रणेचा आाढावा घ्यावा. ऑनलाईन पध्दतीने स्वत: माहिती भरण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे.

एक टीमवर्क म्हणून जनगणनेचे काम केले तर अचूक आणि पारदर्शकपणे काम होण्यास मदत होईल. अधिका-यांनी जनगणनेचा कायदा, त्यात असलेल्या तरतुदी, झालेले बदल आदी बाबी लक्षपूर्वक वाचाव्यात. तसेच या कामात स्वत: लक्ष द्यावे. केवळ कर्मचारी किंवा ऑपरेटरच्या भरोश्यावर अवलंबून राहू नये. जनगणनेचे काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशाही सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची उपलब्धता तसेच चंद्रपूर (ब्रम्हपुरी) – भंडारा समृध्दी महामार्ग, नागपूर – चंद्रपूर महामार्ग आणि वर्धा – बल्लारशहा तिसरी आणि चवथ्या रेल्वे लाईनकरीता भुसंपादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

एस.आय.आर. बाबत आढावा : निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी काळात छायाचित्र मतदार याद्यांचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एस.आय. आर.) हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी एसआयआर मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात एसआयआर मोहीम सुरू होण्यापुर्वी सर्व उपविभागीय अधिका-यांनी प्राथमिक तयारी करून ठेवावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख यांनी सादरीकरण केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये