ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांना सायबर सुरक्षेचे धडे
वर्धा पोलिसांतर्फे जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, वर्धा-२ (ग्रामीण) यांच्या वतीने पंचायत समिती सेस फंडांतर्गत ‘मातोश्री सभागृह, आर्वी रोड’ येथे ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वर्धा पोलीस दलाच्या वतीने उपस्थितांना सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक आशिष चीलांगे यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांवर प्रकाश टाकला. ‘सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती शेअर टाळावी,’ असे आवाहन त्यांनी केले. तसेच बँक फ्रॉड किंवा फेसबुक-इन्स्टाग्रामच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याचे तंत्र त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. महिला पोलीस अंमलदार स्मिता महाजन यांनी महिलांच्या कायदेविषयक हक्कांवर आणि सायबर सेलच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास किंवा सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास न घाबरता तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात जेंडर, आरोग्य आणि कुटुंब नियोजनासोबतच सायबर सुरक्षा हा विषय महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाला ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली आणि महिला उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात सायबर साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे.



